गांधी तीर्थ राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने केली साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या उपक्रमांची पाहणी व कौतुक

केज/प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने दरवर्षी गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता घेण्यात येते. यानिमित्ताने राज्यातील या प्रतियोगितेत सहभागी शाळांना स्वच्छतेच्या संदर्भात,पर्यावरणाच्या संदर्भा मध्ये,टाकाऊ पासून टिकाऊ,प्लास्टिक मुक्त,वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणारे विविध उपक्रम,वैयक्तिक स्वच्छता,सार्वजनिक स्वच्छता,पथनाट्य, स्वच्छता रॅली,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,पोस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धा मधून मुलांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देणे व गांधीजींच्या विचाराची धारा मुलां पर्यंत पोहोचवण्याचे काम उत्कृष्ट रीतीने गांधी तीर्थ राज्यस्तरीय प्रतियोगिता यातून केले जाते.
नियोजना प्रमाणे सहभागी प्रत्येक शाळेने वर्षभर राबवलेल्या उपक्रमाचे व्हिडिओज, फोटो,प्रसार माध्यमे, यातून मुलांमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये गांधीजींच्या विचारा वरती संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना राज्यस्तर, जिल्हा स्तर,विभाग स्तर, तालुकास्तर यावर प्रथम, द्वितीय,तृतीय अशी बक्षिसे दिली जातात. यातही मोठ्या प्रमाणात या शाळेचे विद्यार्थी सहभागी होतात.मागील दोन वर्ष या शाळेने राज्यस्तरीय प्रतियोगिते मध्ये राज्यातील महसूल विभागातून प्रथम क्रमांक मिळवला होता.सतत दोन्ही वर्ष ५१००० चे प्रथम पारितोषिक प्राप्त केले होते.याही वर्षी वरील प्रमाणे उपक्रम राबवून स्वयं मूल्यमापन करून सदर फाउंडेशन कडे पाठवले होते. राज्यातुन निवडल्या गेलेल्या ४० शाळांमध्ये साने गुरुजी निवासी विद्यालय यांची निवड होऊन राज्यस्तरावरून मूल्यांकन दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी झाले.
वेस्टेज कागदा पासून कागद निर्मिती, निर्माल्या पासून धूप निर्मिती,गांडूळ खत निर्मिती,पालापाचोळ्या पासून सेंद्रिय खत निर्मिती,प्लास्टिक संकलन व पुन्हा वापरासाठी प्लास्टिक केंद्रावरती पोहोचवणे, टाकाऊ पासून टिकाऊ, नैसर्गिक वस्तूंपासून युरीगो अर्क इ.उपक्रमाचे श्री.गिरीश कुलकर्णी, पाटील सर यांनी भरभरून कौतुक केले. त्याचवेळी भरवलेल्या प्रदर्शनाची देखील त्यांनी पाहणी केली.सर्व शिक्षक व उपस्थिती विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्व व गांधीजींचे विचार विशद केले.साने गुरुजी निवासी विद्यालयाने राबवलेल्या या उपक्रमाचे कमिटीने भरभरून कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.



