नांदुरघाट ग्रामपंचायत मध्ये ग्राम रोजगार सेवक यांच्या बोगस सह्या करुन केला कोटी रूपयांचा भ्रष्टाचार ! नांदुरघाटच्या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी होणार काय ?

केज/प्रतिनिधी
राष्ट्रीय ते ग्राम पातळीवर भ्रष्टाचाराचा राक्षस आपले मोठे तोंड उघडून शासकिय योजनांचा बट्ट्याघोळ करताना दिसत आहे.ज्यांना जेवढे खायले मिळते ते त्या पध्दतीने ओरबाडून खाण्यात पारंगत झालेले दिसतात,भ्रष्टाचार कसा करायचा याचे आधुनिक प्रशिक्षण तर कार्यकत्यांना मिळत असावे असाच संशय व्यक्त केला तर हरकत नाही.ग्रामपंचायत पातळीवर भ्रष्टाचार कशा प्रकारे केला जावू शकतो याचे आदर्शवत उदाहरण नांदुरघाट ग्रा.पं.मध्ये दिसून आलेले आहे.आणि या भ्रष्टाचाराची चौकशी आता एसआयटीमार्फत होण्याची गरज भासली आहे.
दोन वर्षापूर्वी नांदूरघाट ग्रामपंचातची निवडणूक झाली व या निवडणुकीत सत्ता पलट करण्यात विद्यमान ग्राम पंचायत पॅनल ला यश आले.मात्र सत्ता येताच, फक्त दोन वर्षे उलटली असतानाच ग्रामपंचायत मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.ग्रामपंचायतचे रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले शेख सादिक यांनी तीन ते चार दिवसापूर्वी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार देण्यात आली होती.व या तक्रारीत त्यांनी असेम्हटले आहे की,२०२४-२०२५ मध्ये रोजगार हमीद्वारे जी कामे झाली आहेत त्या कामात बोगस बिले उचलण्यात आली आहेत.
या कामाच्या बाबतीत ग्रामसेवक व रोजगार सेवक यांची दिशाभूल करून बोगस सह्या करण्यात आल्या असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.या एकूण कामात जवळपास मंजूर कामे ही चार ते पाच कोटी चे आहेत जून ते जुलै २०२५ मध्ये एक कोटी ५४ लाख हे बोगस सह्या करून पैसे उचलले गेले आहेत.असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारी नंतर बीड जिल्हा परिषद मुख्यकारी अधिकारी यांनी पाच अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करून तात्काळ नांदूरघाटमध्ये झालेल्या सर्व कामाचे भ्रष्टाचारचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.नंतर दि.१६ जानेवारी २०२६ रोजी बी डी ओ नागरगोजे यांच्या नियंत्रणाखाली समिती नांदूरघाट मध्ये दाखल झाली. दिवसभर झालेल्या सर्व कामाचे मोजमाप करण्यात आले. पांदण रस्ते दलीत वस्तीतील रस्ते,गाव अंतर्गत गावातील सिमेंट रस्ते असे अनेक कामे ही अर्धवट अवस्थेत तर कुठे रस्ता न करताच बिले उचलली आहेत असे प्रथमदर्शनी चित्र दिसत आहे.यात भ्रष्टाचाराचा आकडा अजून वाढण्याची दाट शक्यता आहे.
सीसीटीवी खरेदीत ही लाखोंचा भ्रष्टाचार ?
नांदूरघाट ग्रामपंचायत गावातील मुख्य रस्ते व चौका चौकात सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे बसविण्या साठी ही लाखोंचा बिले उचलली आहेत.परंतु सी सी टी वी कॅमेरा कुठे ही बसविण्यात आलेला नाही.या सर्व भ्रष्ट कारभाराबाबत जनतेत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.नागरिकांत ग्राम पंचायच्या कारभारावर संभ्रम व रोष निर्माण झाला आहे.
घरकुल वाटपात ही कोटींचा घोटाळा ?
घरकुल वाटपात ही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका या प्रकरणाने उपस्थित झाली आहे.आणि यांची सर्वत्र चर्चा ही नागरिकात होताना दिसत आहे.
या सर्व भ्रष्ट कारभाराचा मास्टर माईंड कोण आहे ते प्रशासनाने एस आय टी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत ग्रामपंचायत बरखास्त केली पाहिजे.अशीमागणी ग्रामस्थ करत आहेत.
नांदूरघाटमध्ये सध्या सगळा भोंगळा कारभार चालू आहे,गेली दोन वर्षांत एक ही ग्रामसभा झालेली नाही व कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता हे सर्व काळे धंदे चालू आहेत तरी संबंधितावर गुन्हे दाखल झालें पाहिजेत.अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे.



