
केज/प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा लावला आहे.पदभार स्वीकारल्यापासून सलग दोन दिवसांत पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव येथे केलेल्या मोठ्या कारवायांमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेते,निकृष्ट दर्जाचे तूप-खवाउत्पादक आणि रसायनांच्या सहाय्याने फळे पिकवणाऱ्या रॅकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पहिल्याच दिवशी पुण्यात ८०० किलो आंबे जप्त करण्यात आले आहेत.
मंगळवार दि.२६ मे रोजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शना खाली पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी ता. इंदापूर येथे FDA ने मोठी कारवाई केली. आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले तब्बल ८०० किलो आंबे येथे जप्त करण्यात आले.जप्त केलेल्या आंब्यांची किंमत सुमारे २० हजार रुपये असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर याद्वारे कडक संदेश देण्यात आला आहे. छत्रपती
संभाजीनगरमध्ये बनावट तूप,तर धाराशिवमध्ये निकृष्ट खवा जप्त
पुण्यातील कारवाईच्या दिवशीच अन्न व औषध प्रशासन विभागाने छत्रपती संभाजीनगर येथेही छापा टाकला. तेथे विक्रीसाठी ठेवलेले ४० हजार ९६० रुपयांचे संशयित व निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त करण्यात आले.या प्रकरणी संबंधित विक्रेते आणि उत्पादकांविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बुधवार दि.२७ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे मोठी कारवाई करण्यात आली.येथील एका केंद्रावर छापा टाकून २१५ किलो निकृष्ट दर्जाचा खवा जप्त करण्यात आला. या खव्याची बाजारपेठे तील किंमत अंदाजे ४७ हजार ३०० रुपये आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा कायद्यान्वये एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रशासन अधिक तपास करत आहे.
कारवाईचा संक्षिप्त गोषवारा पुढील प्रमाणे आहे.
जप्त केलेला मुद्देमाल अंदाजे किंमत दि.२६ मे निमगावकेतकी (पुणे) ८०० किलो रसायनयुक्त आंबे ₹ २०,०००,दि.२६ मे छत्रपती संभाजीनगर निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप ₹ ४०,९६०,दि.२७ मे येरमाळा (धाराशिव) २१५ किलो निकृष्ट खवा ६ जणांवर गुन्हे ₹ ४७,३००
ग्राहकांचा अधिकार सर्वोच्च भेसळयुक्त, निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.ग्राहकांना सुरक्षित,दर्जेदार आणि रसायनमुक्त अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.हा अधिकार हिरावणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
तुकाराम मुंढे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य
जनतेकडून कारवाईचे स्वागत
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक,शिस्तप्रिय आणि पारदर्शक प्रशासन शैली साठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांनी यापूर्वीही अनेक विभागांत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारां विरोधात मोहीम उघडली होती.आता FDA च्या आयुक्तपदी त्यांची वर्णी लागल्यामुळे अन्नभेसळ, बनावट औषधे,परवान्यां मधील गैरव्यवहार आणि बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्रीला पूर्णपणे लगाम बसेल,अशीआशा व्यक्त केली जात आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अशीच कायमस्वरूपी आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत असून मुंढे यांच्या या सुरुवातीच्या धडाक्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.



