सामाजिक

स्व.गोपीनाथ मुंडे यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न धनंजय मुंडे करत आहेत पूर्ण,ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला मिळत आहे नवी दिशा -सौ.आशाताई बाजीराव ढाकणे 

केज/प्रतिनिधी

राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण विकासाच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगार, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या प्रश्नांबाबत कायमच संवेदनशील भूमिका घेतली होती. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न होते.त्यांच्या अकाली निधनामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले,मात्र आता त्यांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे हे लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील लाखो ऊसतोड कामगारांचे जीवन आजही संघर्षमय आहे.दरवर्षीरोजगाराच्या शोधात कुटुंबासह स्थलांतर करावे लागत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते, तर काही मुलांना लहान वयातच मजुरीकडे वळावे लागते.ही परिस्थिती बदलण्या साठी शैक्षणिक सुविधांची गरज ओळखून धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमा तून विविध कल्याणकारी उपक्रम सुरू केले.

यामध्ये संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा उपक्रम मानला जात आहे.या योजने अंतर्गत बीड जिल्ह्यात तब्बल २२ सुसज्ज वसतिगृहांची उभारणी सुरू असून, त्यामध्ये सुमारे २२०० ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना मोफत निवास,भोजन आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील गरीब आणि स्थलांतरित कुटुंबांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे.विशेष म्हणजे या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना केवळ राहण्याची सोय मिळणार नसून,त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणा साठी आवश्यक वातावरण,शैक्षणिक मार्गदर्शन आणि सुरक्षितता देखील मिळणार आहे.त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम भविष्य घडविण्याची संधी प्राप्त होणार आहे.

सामाजिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते,ही योजना केवळ शासकीय सुविधा नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे.अनेक पिढ्यांपासून हातात कोयता घेऊन जगणाऱ्या कुटुंबांच्या मुलांच्या हातात आता वही,पेन आणि पुस्तक देण्याचे काम या योजनेतून होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून गरिबीचे दुष्टचक्र मोडण्याची ताकद या उपक्रमात असल्याचेही मत व्यक्त होत आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर कष्टकरी,शेतकरी आणि वंचित घटकांसाठी लढा दिला.त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उचललेली पावले ही त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेली महत्त्वाची पावले मानली जात आहेत.त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असल्याची भावना ऊसतोड कामगार आणि सामाजिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

आगामी काळात या योजनांचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना मिळणार असून,त्यातून ऊसतोड कामगार समाजात शिक्षणाची नवी क्रांती घडण्याची अपेक्षा आहे.ऊसतोड कामगारांचे जीवन हे सतत स्थलांतराशी जोडलेले असते.सहा-सहा महिने गाव सोडून परराज्यात किंवा इतर जिल्ह्यांत जाऊन काम करावे लागते.अशा वेळी मुलांचे शिक्षण खंडित होते. अनेक मुलींचे शिक्षण मध्येच थांबते,तर काही मुलांना लहान वयातच मजुरी करावी लागते.या दुष्टचक्राला थांबवण्या साठी सुरक्षित,सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षणाची गरज होती.

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना ही नेमकी हीच गरज पूर्ण करणारी ठरत आहे.या वसतिगृहांमुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांना केवळ निवारा मिळणार नाही,तर शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळणार आहे.अभ्यासासाठी आवश्यक सुविधा, पौष्टिक आहार,शिस्तबद्ध दिनचर्या आणि शैक्षणिक मार्गदर्शन यामुळे ही मुले भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील सक्षम नागरिक म्हणून घडू शकतील.सामाजिक परिवर्तनाची खरी ताकद शिक्षणात असते आणि त्या परिवर्तनाचा पाया या योजनेतून मजबूत होत आहे.विशेष म्हणजे या योजनेमुळे ऊसतोड कामगार पालकांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

आपल्या मुलांनी आपल्यासारखे कष्टमय जीवन जगू नये ही त्यांची भावना आता वास्तवात उतरू लागली आहे.आजपर्यंत ज्यांच्या हातात कोयता होता,त्या पिढीच्या मुलांच्या हातात आता वही,पेन आणि पुस्तक दिसू लागणार आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून गरिबीचे चक्र मोडण्याची ताकद या योजनेत आहे.धनंजय मुंडे यांनी या योजनेच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची खरी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. समाजातील वंचित, कष्टकरी आणि दुर्लक्षित घटकांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हे कार्य निश्चितच ऐतिहासिक आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारांना पुढे नेत,ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी उभारलेला हा शिक्षणाचा दीपस्तंभ अनेक पिढ्यांना दिशा देणारा ठरणार आहे.

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेचे जनक म्हणून आ.धनंजय मुंडे साहेबांचे नाव भविष्यात इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल,यात शंका नाही.कारण त्यांनी केवळ इमारती उभारल्या नाहीत,तर हजारो गरीब मुलांच्या आयुष्याला नवी स्वप्ने,नवी उमेद आणि नवे भविष्य दिले आहे अशी माहिती सौ. आशाताई बाजीराव ढाकणे सामाजिक कार्यकर्त्या तथा सचिव श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला पो देवगाव ता केज जि बीड यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!