अंबाजोगाईचे दोन विद्यार्थी लातूरमध्ये NEET ची तयारी करायचे, आता CBI कडून चौकशी, काय घडलं? लातूरमध्ये राहून NEET परिक्षेची तयारी करणाऱ्या अंबाजोगाईतील दोन विद्यार्थ्यांना सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतलंय


अंबाजोगाई (प्रतिनिधी)
देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET (वैद्यकीय पात्रता परीक्षा) पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड शहरासह अंबाजोगाईत पोहोचले असून,या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आज अंबाजोगाईत धडक कारवाई केली. सीबीआयच्या पथकाने शहरातील दोन संशयित विद्यार्थ्यांची तब्बल दोन तास कसून चौकशी केल्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन एका अज्ञात ठिकाणी चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे विशेष तपास पथक आज, 21 मे रोजी सकाळीच अत्यंत गुप्तपणे अंबाजोगाई शहरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांनाही फारशी कल्पना न देता सीबीआयने थेट संशयित विद्यार्थ्यांचा शोध घेत कारवाई सुरू केली. या पथकाने दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन एका अज्ञात ठिकाणी त्यांची दोन तास कसून चौकशी केली आहे.
विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि मेमरी कार्ड घेतले ताब्यात घेतले
चौकशी दरम्यान तपास यंत्रणेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत अंबाजोगाईतील दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि मेमरी कार्ड आपल्या ताब्यात घेतले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी लातूर येथे राहून वैद्यकीय परीक्षेचे (NEET) तयारी करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. लातूर हे महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेसचे मुख्य केंद्र असल्याने, या प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरमधील मोठ्या रॅकेटशी जोडले गेले आहेत का? यादृष्टीने तपास सुरू झाला आहे.
अंबाजोगाईतील या दोन्ही संशयित विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गैरमार्गाने किंवा आर्थिक देवाणघेवाण करून NEET पेपर मिळवला असल्याचा दाट संशय सीबीआयला आहे .जे ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि मेमरी कार्डमधील डिजिटल डेटा, चॅट्स आणि कॉल्सच्या माध्यमातून या संशयाची शहानिशा केली जात आहे.
दरम्यान बीड आणि लातूर जिल्हा आधीच नीट प्रकरणातील काही संशयितांच्या अटकेमुळे चर्चेत आहे. आता थेट अंबाजोगाईत सीबीआयने पाऊल ठेवल्यामुळे या रॅकेटची पाळेमुळे मराठवाड्यात किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्ट होत आहे. आजच्या या मॅरेथॉन चौकशीतून आणि जप्त केलेल्या मोबाईलच्या फॉरेन्सिक डेटावरून आता नेमका कोणता मोठा खुलासा समोर येतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



