

केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२५ च्या पीकविम्याची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी पुढाकार घेत संबंधित स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.
शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत खासदार सोनवणे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे कृषिमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे कृषिमंत्री यांच्या कडे निवेदन सादर करून पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले की,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून शासन स्तरावर सातत्याने हा मुद्दा मांडला जात आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आवश्यक तो पाठपुरावा सुरू ठेवला जाईल.शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण सदैव सकारात्मक भूमिका घेत असून पीकविमा रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न सुरू राहतील,असा विश्वास खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.



