गो सन्मान आवाहन अभियान: केज मध्ये ६००० गो प्रेमींच्या सह्यांचे तहसीलदारांना निवेदन

केज/प्रतिनिधी
संपूर्ण भारतामध्ये राबवल्या जात असलेल्या ‘गो सन्मान आवाहन अभियाना’ अंतर्गत केज शहरात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.केज शहरातील गोसेवक, गोप्रेमी, गोशाळा संचालक आणि साधु -संतांच्या वतीने तहसीलदार यांना ६००० गोप्रेमींच्या सह्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनाद्वारे गायीला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्यासह विविध ३० हून अधिक मागण्या सरकारकडे मांडण्यात आल्या आहेत.
लोकसहभागातून उमटला आवाज
‘गो सन्मान आवाहन अभियाना’ची व्याप्ती आज केजमध्ये दिसून आली.”भारतीय संस्कृती आणि राष्ट्रहितासाठी संविधानाच्या कक्षेत राहून अहिंसक पद्धतीने गोमातेसाठी प्रार्थना करणे आणि तिचा सन्मान करणे” हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.केज परिसरातील ६००० नागरिकांनी प्रत्यक्ष सह्या करून या निवेदनाला आपला पाठिंबा दर्शवला असून, हे निवेदन सोमवार दि. २७ एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालयात सुपूर्द करण्यात आले.
सरकारला सादर केलेल्या निवेदनातील मुख्य मागण्या :
१.गोरक्षणाशी संबंधित मागण्या:
गायीला ‘राष्ट्रमाता’,राष्ट्रीय देवता आणि राष्ट्र धरोहर असा सन्माननीय दर्जा देण्यात यावा,गोसेवेसाठी संपूर्ण भारतात एकसमान केंद्रीय कायदा लागू करावा,भारतात गोहत्या पूर्णपणे बंद करून गोवंश सुरक्षित करावा.
२.गोशाळा आणि अनुदानाबाबत:
प्रत्येक ग्रामपंचायतीत निराधार नंदींसाठी ‘नंदीशाळा’ स्थापन करावी,गोशाळेत काम करणाऱ्यांना ‘मनरेगा’ अंतर्गत मजुरी मिळावी आणि गोशाळांचे बांधकाम मनरेगा योजने तून व्हावे,गोशाळांना मोफत वीज युनिट किंवा वीज बिलात विशेष सवलत मिळावी,निराधार गुरांच्या संगोपनासाठी सर्व राज्यांमध्ये गोशाळांना योग्य अनुदान मिळावे.
३.शेती आणि गो-उत्पादने:
रासायनिक शेतीनियंत्रित करून गोमूत्रावर आधारित शेतीला प्रोत्साहन द्यावे,सरकारी इमारतींमध्ये फिनाईल ऐवजी ‘गोनैल’ आणि रासायनिक रंगांऐवजी शेणापासून बनवलेल्या रंगांचा वापर अनिवार्य करावा,शाळांमधील मध्यान्ह भोजनात गायीच्या दुधाचा समावेश करावा.
४.आरोग्य आणि कायदेशीर तरतुदी:
जिल्हा पातळीवर स्वतंत्र ‘पंचगव्य रुग्णालये’ स्थापन करावीत.महामार्गावर जखमी गुरांच्या उपचारासाठी दर ५० किमीवर ‘गोवाहिनि रुग्णवाहिका’ तैनात करावी,गोवंश तस्करी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांची वाहने कायमची जप्त करावीत.
साधु-संत आणि मान्यवरांची उपस्थिती
यावेळी निवेदन सादर करताना केज परिसरा तील विविध मठांचे महंत आणि साधु-संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गायीच्या शरीरात ३३ कोटी देवी-देवतांची सात्त्विक शक्ती असून गायीशिवाय भारतीय संस्कृतीची कल्पना करणे अशक्य आहे,” अशी भावना गोप्रेमींनी व्यक्त केली. तहसीलदारांनी हे निवेदन स्वीकारले असून,६००० नागरिकांच्या सह्यांचे हे निवेदन पुढील कार्यवाही साठी वरिष्ठ स्तरावर आणि सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.



