आजच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी शिक्षणा बरोबरच व्यवहारीक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे-प्रो.डॉ अहिल्याताई बरुरे

केज/प्रतिनिधी
येथील माऊली विद्यापीठ केज संचलित सरस्वती महाविद्यालय केज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, आंबेजोगाई येथील इंग्रजी विभाग प्रमुख व आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर डॉ. अहिल्याताई बरुरे कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.किरण धिमधीमे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ.वैशाली आहेर ,भूगोल विभाग प्रमुख डॉ.नागेश कराळे आणि अजीवन शिक्षण आणि विस्तार विभागा च्या कार्यक्रमाधिकारी डॉ.अर्चना वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजीवन शिक्षणविस्तार विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ.अर्चना वाघमारे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ.अहिल्याताई बरुरे यांनी आजीवन शिक्षण विभागाचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतातील अनेक शैक्षणिक धोरणामध्ये आजीवन शिक्षणाचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले गेले आहे.
शिक्षण आयोगा च्या अहवालात १९६४ -६६ असे आढळून आले की शिक्षण हे शालेय शिक्षणाने संपत नाही तर ती एक आजीवन प्रक्रिया आहे, भारतातील राष्ट्रीय शिक्षण धोरण – १९८६ मध्ये आणि १९९२ मध्ये सुधारित आयोगा मध्ये आजीवन शिक्षण हे शैक्षणिक प्रक्रियेचे मुख्य ध्येय मानले गेले ज्यामध्ये सार्वत्रिक साक्षरता,तरुण,गृहिणी, कृषी आणि औद्योगिक कामगार आणि व्यावसायिकांना त्यांच्या आवडीच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.तेव्हा आजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षणा बरोबरच व्यवहारिक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.असे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी केले.
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. वैशाली यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की,राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये भारताने २०१५ मध्ये स्वीकारलेल्या शाश्वत विकासाच्या २०३० अजेंडाच्या ध्येय ४ (SDG4) मध्ये प्रतिबिंबित झालेल्या जागतिक शिक्षण विकास अजेंड्याचा भाग असून २०३० पर्यंत सर्वसमावेशक आणि समान दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे असे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.किरण धिमधीमे यांनी यांनी म्हटले की, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग हा विद्यापीठामार्फत महाविद्यालयीन स्तरावर राबविला जातो.शिक्षण हे आर्थिक असमानता कमी करते,सर्व गटांना योग्य संधी देते आणि इतर संस्कृतींबद्दल जबाबदारी आणि आदराची भावना विकसित करते.
ज्ञान आणि संसाधनांची उपलब्धता प्रदान करून समाजात शांतता आणि सुसंवाद राखण्यात आजीवन शिक्षण हे अविरत प्रयत्न करत असते असे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भूगोल विभाग प्रमुख डॉ.नागेश काळे यांनी केले तर आभार ग्रंथपाल प्रा.अशोक घोडके यांनी मानले.या कार्यक्रमाला महा विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



