आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानेश मातेकर यांना जाहीर
5 सप्टेंबर शिक्षक दिनी राजयोगच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण !

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
5 सप्टेंबर शिक्षक दिनी राजयोगच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण !
लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीर येथील उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर यांना दैनिक समर्थ राजयोगच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिनी शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी आश्रम शाळेसह दुर्गम भागातील आणि माध्यम क्षेत्राशी निगडित आदर्श शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे पहिल्या टप्प्यातील सहा शिक्षकांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. निवड केलेल्या शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दैनिक समर्थ राजयोगच्या वतीने प्रतिवर्षी वर्धापन दिन हा विविध क्षेत्रातील आदर्श गुणवंत शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन साजरा करण्यात येतो. यावर्षी आश्रम शाळेतील शिक्षकांसह जिल्हा परिषद, खाजगी शैक्षणिक संस्था, माध्यम क्षेत्राशी निगडित शिक्षकांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये आश्रम शाळेतील शिक्षकांना 150 व्या जयंतीनिमित्त भगवान बिरसा मुंडा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद, खाजगी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षकांना देखील आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तर माध्यमांची निगडित शिक्षकांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात येणार आहे.
माध्यम क्षेत्राशी निगडित असलेल्या पुरस्कारामध्ये यावर्षी अंबाजोगाई येथील रहिवासी तथा उदगीर येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर,आष्टी येथील सहशिक्षक राजेंद्र लाड,माजलगाव येथील प्रा. सुदर्शन स्वामी, परळी वैजनाथ येथील सहशिक्षक अनुप कुसुमकर, केज तालुक्यातील सहशिक्षक नरहरी काकडे आणि पाटोदा येथील प्राचार्य तुकाराम तुपे या गुणवंत सहा शिक्षकांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. निवड केलेल्या शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
येणाऱ्या 5 सप्टेंबर रोजी निवड केलेल्या आदर्श शिक्षकांना संत महंत, लोकप्रतिनिधी, संपादक पत्रकार, आणि प्रशासकीय अधिकारी तसेच समाजसेवक यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या आदर्श उपक्रमाला आणि कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी नागरिकांनी तसेच दैनिक समर्थ राजयोग परिवारावर प्रेम करणाऱ्या तमाम वाचक, जाहिरातदार, प्रतिनिधी, नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची उंची आणि शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांनी केले आहे.