सामाजिकसाहित्यिक

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन गोडवा’काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न – डॉ.दीपकराव कासराळीकर

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर लिखित ‘गोडवा’ या हायकू काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार,दिनांक ७ जून रोजी केज येथील कानडी रोडवरील उत्सव फंक्शन हॉलमध्ये अत्यंत उत्साहात व दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. पुणे येथील नामांकित ‘अनुबंध प्रकाशन’ तर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मराठवाडा साहित्य परिषद (म.सा.प.)केज शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला परिसरा तील साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यामध्ये

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.जी. बी.गदळे हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दीपकराव कासराळीकर,श्री. जयंतराव वाकोडकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य दगडू दादा लोमटे, आणि केज ‘मसाप’चे अध्यक्ष प्रा.डॉ.नवनाथ काशीद सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘गोडवा’ या पुस्तकाचे विधिवत प्रकाशन करण्यात आले.

साहित्यातून मिळते ऊर्जा,पुस्तकाच्या मैत्रीने माणूस श्रीमंत होतो – श्री.जयंतराव वाकोडकर

याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे श्री. जयंतराव वाकोडकर म्हणाले की,पालकांनी आजच्या काळात मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे.साहित्यातून माणसाला नवीन ऊर्जा प्राप्त होते आणि पुस्तकाच्या मैत्रीमुळे माणूस वैचारिकदृष्ट्या श्रीमंत होतो.कविता ही शेवटी वेदनेचा हुंकार असते.

नेमके बोलण्याची कला म्हणजे हायकू-डॉ. दीपकराव कासराळीकर

प्रसिद्ध समीक्षक व साहित्यिक डॉ.दीपकराव कासराळीकर यांनी लेखकाच्या लेखनशैलीचे कौतुक करताना सांगितले की,आशय आणि अभिव्यक्ती यांच्या अद्वैतातून कविता जन्माला येते.अगदी कमी शब्दात नेमके पणाने बोलण्याची कला म्हणजे ‘हायकू’ होय. आनंदगावकर यांच्या हायकू मधून माणूसपण, मिश्किलता आणि गंमतीशीरपणा अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त झाला असून या संग्रहातून सामाजिकतेचे उत्तम दर्शन घडते.

अध्यक्षीय समारोपात श्री.जी.बी.गदळे यांनी, “कुंपण”आणि “अस्तित्व” या काव्य संग्रहानंतर प्रा.आनंदगावकर यांनी हायकू सारख्या अल्पाक्षरी काव्य प्रकारा तून समाजमनाचे दर्शन घडवण्याचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे,असे सांगत केजच्या साहित्य विश्वात आज हायकू चा नवा तुरा रोवला गेला आहे,असा गौरवपूर्ण विश्वास व्यक्त केला.

या सोहळ्याला विशेष उपस्थिती म्हणून कवी गोरख शेंद्रे,राजेसाहेब पापा देशमुख,पत्रकार श्रावणकुमार जाधव, चंद्रकांत पाटील,अक्षर परिवारचे विष्णू यादव, विक्रम डोईफोडे,किशोर भालेराव,महादेव ढाकणे, प्रा.अनिल गायकवाड, प्रा.सोळंके,प्रा.गित्ते,श्री.लोखंडे,श्री.वेदपाठक, आणि किशोर गोले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कवी जनार्दन सोनवणे आणि कविता गोले यांनी संग्रहातील हायकूचे रसपूर्ण वाचन केले.

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला केज शहर व परिसरातील लेखक, कवी,प्राध्यापक आणि नागरिक सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय कुलकर्णी यांनी केले. प्रमुख मान्यवरांचा परिचय कवी हनुमंत घाडगे यांनी करून दिला.संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले,तर उपस्थितांचे आभार श्री.महेश दादा आनंदगावकर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल आनंदगावकर, रवी गायकवाड यांच्या सह मराठवाडा साहित्य परिषद केज शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.अत्यंत भावपूर्ण वातावरणात पसायदाना नंतर या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!