स्व.विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमाला पुष्प- ५ वे अस्वस्थ मनस्थितीतून सहजरीत्या केलेली सेवा म्हणजे समाजसेवा – प्राचार्य सोमनाथ रोडे


केज/प्रतिनिधी
“वेदना ही जीवन की साधना होती है.” या उक्तीप्रमाणे समाजसेवक बाबा आमटे आणि तुळशीराम यांची भेट ही कुष्ठरोगी सेवेच्या इतिहासातील एक अत्यंत भावनिक आणि निर्णायक क्षण मानला जातो.या भेटीनंतरच बाबांनी आपले आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला.तो एका ओढ्याकाठी मरणासन्न अवस्थेत पडला होता.

कुष्ठरोगामुळे त्याच्या शरीराची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती.या भयावह अवस्थेने त्यांना आतून हलवून सोडले. समाजातील कुष्ठरोग्यांची उपेक्षा पाहून त्यांना प्रचंड वेदना झाल्या आणि कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा निश्चय केला. बेचैन अवस्थेतून राहवत नाही म्हणून सहजरीत्या केलेली सेवा म्हणजे समाजसेवा होय.सेवा किंवा सत्कर्म करताना स्वार्थ न ठेवता सर्वांभूती भगवद्भाव पाहणे, म्हणजेच जातीच्या पलीकडे जाऊन कर्म करणे असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि.२५ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुखवक्ते म्हणून प्राचार्य सोमनाथ रोडे विभागीय अध्यक्ष,मराठवाडा जनता विकास परिषद, छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते.तर अध्यक्ष म्हणून श्री.दगडू दादा लोमटे कार्यकारिणी सदस्य, मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते.इतर उपस्थितीत मान्यवरांमध्ये जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष, अंकुशरावजी इंगळे, सचिव जी.बी. गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ, मसने साहेब,रांजणकर साहेब,रेवले साहेब आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय मेघशाम मंगरूळकर यांनी दिला.पाचवे पुष्प गुंफताना ” जाती तोडो, भारत जोडो ” या विषया वर बोलताना प्राचार्य सोमनाथ रोडे पुढे काय म्हणाले की,१९४९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे बाबांनी आनंदवन या आश्रमाची स्थापना केली.परंतु त्यांचे कार्य केवळ कुष्ठरोग्या पुरते मर्यादित नव्हते, पर्यावरणाचे रक्षक आणि समाजात बंधुता निर्माण करणारे ते एक महान समाजसुधारक होते. १९९० मध्ये “नर्मदा बचाव आंदोलन” पर्यावरण व विस्थापितां साठी दिलेला लढा, “वन्य-जीव संरक्षण” मोहीम तसेच देशात एकता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी २४ डिसेंबर १९८५ रोजी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ” भारत जोडो ” मोहीम काढली.याद्वारे त्यांनी तरुणांचा सामाजिक,धार्मिक, आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला.
अध्यक्षीय समारोपात दगडू दादा लोमटे म्हणाले की,अखंड भारत देशाचे वर्णन करताना “सांस्कृतिक विविधता” किंवा “विविधतेमध्ये एकता” असे करतो. अशा बहुभाषिक देशांमध्ये राहायचं म्हटले की,आपल्याला देखील सर्व भाषेचे ज्ञान असले पाहिजे.प्रत्येक भाषेचा, धर्माचा,संस्कृतीचा आपण सन्मान केला पाहिजे.परंतु दुःख, अहंकार,जातीयता, धर्मांधता यामुळे आपल्या भावना संकुचित बनत आहेत.
आपण फक्त स्व: हिताचा विचार करत आहोत.यासाठी सुशिक्षित वर्ग ही तितकाच जबाबदार आहे.जातीयता व धार्मिक तणाव हे देखील बाबा आमटे यांच्या अस्वस्थतेचे कारण होते. बाबांनी स्वातंत्रलढ्याच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले.त्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षाही झाली. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली.पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता.
राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स.१९८५ मध्ये ‘भारत जोडो’अभियान योजले होते.यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला.नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.शेवटी दगडू दादा लोमटे यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो मोहिमे तील तसेच अशा अनेक आंदोलनातील काही कटू आठवणींना याप्रसंगी उजाळा देण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सुञसंचलन हनुमंत घाडगे यांनी केले तर आभार कल्याण आदमाने यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.



