डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हेच परिवर्तनाची प्रेरणा – प्रा.नितीन बानगुडे केजमध्ये जय भीम महोत्सव उत्साहात ; रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांचे आयोजन

केज/प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे समाजाचा खरा उद्धार झाला.त्यांनी एक पाऊल पुढे टाकले म्हणून समाज प्रगतीच्या मार्गावर आला मात्र समाज व्यवस्थेत प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, त्याशिवाय परिवर्तन शक्य नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हेच त्या परिवर्तनाची प्रेरणा आहेत,असे प्रतिपादन व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त दिपक कांबळे युवा मंचच्या वतीने केज येथे आयोजित ‘जय भीम महोत्सवा’त प्रबोधनपर वातावरणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन केजचे मा.सभापती विष्णू घुले यांच्या हस्ते झाले.व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे,शेकापचे राज्य समिती सदस्य भाई मोहन गुंड,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे,डॉ.हनुमंत सौदागर,भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल गदळे,शेषेराव कसबे, पत्रकार शुभम खाडे, भाजप युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष धनराज लाटे, माजी नगरसेवक कपिल मस्के,सरपंच महादेव जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.बानगुडे पाटील म्हणाले की, बाबासाहेबांनी अस्पृश्यते च्या तीव्र झळा सहन करत शिक्षणाच्या बळावर जगात आपले स्थान निर्माण केले आणि ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले.पुस्तक माणसाला स्वाभिमान देते,विचार देतात आणि मस्तक कोणाचेही हस्तक होऊ देत नाही असेही त्यांनी अधोरेखित केले. प्रा.बानगुडे यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील रामजी बाबांचे योगदान,राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव अधोरेखित केला.तुम्ही सुरुवात करा, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रकाश तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवेल,असेही प्रा. बानगुडे पाटील यांनी म्हटले.
विष्णू घुले,हनुमंत भोसले यांच्याकडून आयोजकांचे कौतुक उद्घाटक विष्णू घुले यांनी आपल्या मनोगतात दिपक कांबळे युवा मंचाच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की,अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढी पर्यंत प्रभावीपणे पोहोचतात.हनुमंत भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच,त्यांनी आयोजकांच्या नियोजनाबद्दल कौतुक केले.



