तुम्ही ग्रामीण भागात सेवा द्या,मी डाक कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रात प्रयत्न करतो, खा.बजरंग सोनवणे यांच्या डाकअधिकाऱ्यांना सूचना ; बीड जिल्हा डाक विभागाचा घेतला आढावा

केज/प्रतिनिधी
बीड टपाल विभागाने ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अश्या सूचना देत तुम्हाला जिल्हा,तालुका आणि ग्रामीण भागात कार्यालय व आवश्यक सुविधा उपलब्ध करूनदेण्यासाठी मी केंद्रात प्रयत्न करतो, असे आश्वासन खा.बजरंग सोनवणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बीड जिल्ह्यातील टपाल विभागाच्या विविध सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते.ग्रामीण भागा पासून ते डिजिटल व बँकिंग सेवांपर्यंत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, टपाल वितरणातील समस्या तसेच भविष्या तील सुधारणा उपायांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
नागरिकांना अधिक सक्षम,जलद व विश्वासार्ह टपाल सेवा मिळावी,या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला.बैठकीत ग्रामीण टपाल सेवांबाबत विशेष चर्चा झाली.दुर्गम वाड्या -वस्त्यांपर्यंत नियमित टपाल पोहोचते का,शाखा टपाल कार्यालयांची गरज तसेच रिक्त पोस्टमन पदां मुळे होणारा वितरणातील विलंब याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. अनेक ठिकाणी मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे सेवा प्रभावित होत असल्याचे निदर्शनास आले.रिक्त पदांचा प्रश्न हा बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला.पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक (GDS) तसेच इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली. वाढता कामाचा ताण लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
डिजिटल व बँकिंग सेवांचा आढावा घेताना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आधार लिंकिंग,थेट लाभ हस्तांतरण (DBT),पेन्शन तसेच मनरेगा अनुदान वेळेत मिळते का याबाबत चर्चा झाली.अनेक ग्रामीण भागांत नेटवर्क अडचणी तसेच बायोमेट्रिक यंत्रणांच्या समस्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने या त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांबाबत जनजागृती वाढवण्यावर ही बैठकीत भर देण्यात आला.आवर्ती ठेव (RD), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना, मासिक उत्पन्न योजना (MIS) यांचा ग्रामीण भागात अधिक प्रसार व्हावा,यासाठी विशेष मोहिमा राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
महिला बचत गट व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यावरही सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस अधीक्षक टपाल एस.एन.आंबेकर, तक्रार निरीक्षक गौतमकुमार वेदी, सहाय्यक अधीक्षक टपाल लखानसिंग माळवीय, निरीक्षक बी.के.जाकुरे, निरीक्षक पी.ए.महाजन, विपणन कार्यकारी नितीन आमटे,पोस्टमास्तर सचिन काळे यांच्यासह जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या सोडवून टपाल सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी खा.सोनवणे यांनी स्पष्ट करण्यात आले
ग्रामीण भागात पार्सल सेवा वेळेत पोहचावी..
स्पीड पोस्ट व पार्सल सेवांबाबत ई-कॉमर्स पार्सलमध्ये वाढ झाल्याने ग्रामीण वितरणात होणारा उशीर,तसेच ट्रॅकिंग प्रणाली अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.पोस्ट ऑफिस इमारतींच्या स्थितीवरही लक्ष वेधण्यात आले.जीर्ण इमारती,भाड्याच्या जागेत चालणारीकार्यालये तसेच पाणी,स्वच्छतागृह, बसण्याची व्यवस्था अशा मूलभूत सुविधांचा अभाव दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पेन्शनधारक, दिव्यांगबाबत चर्चा
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगां साठी विशेष सेवा सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.पेन्शन धारकांसाठी घरपोच सेवा तसेच दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा वाढवण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली.नवीन वसाहती व गावांना पिनकोड व वितरण मार्गात समाविष्ट करणे, अपूर्ण पत्त्यांमुळे टपाल परत जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
तक्रार निवारण शिबिरा बाबत प्रस्ताव तक्रार निवारण व्यवस्थेबाबत जिल्हास्तरीय हेल्पलाईन सुरू करणे तसेच विशेष तक्रार निवारण शिबिरे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. भविष्यातील सुधारणा म्हणून बीडमध्ये ‘मॉडेल पोस्ट ऑफिस’,ग्रामीण भागात पोस्टल एटीएम व पार्सल हब सुरूकरण्याची मागणी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘पोस्ट ऑफिस भेट’ उपक्रम राबवण्याची सूचनाही यावेळी देण्यात आली.
अंबाजोगाईत पासपोर्ट सेवा मिळावी
या सोबतच अंबाजोगाई येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे,यासाठी माननीय मंत्री महोदयांची भेट घेऊन मागणी करण्यात आल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.



