
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील देवगाव,दहिफळ वडमाउली,सारणी, सांगवी,सारुळ आणि नांदूरघाट परिसराला गुरुवारी सायंकाळी निसर्गाच्या कोपाचा मोठा फटका बसला सोसाट्याचा वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटात झालेल्या या भागातील शेतीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात ढगांची गर्दी झाली आणि काही वेळातच जोराचा पाऊस सुरू झाला या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेला गहू ज्वारी,आणि हरभरा ही पिके जमीनदोस्त झाली आहेत.रब्बी पिका सोबतच आंबा,टरबूज यासारख्या नगदी फळबागांनाही या गारपीटीचा मोठा तडाका बसला असून फळांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे .
वर्षभर रक्ताचे पाणी करून जोपासलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहून शेतकऱ्यांनी मोठा हंबरडा फोडला आहे.या अवकाळी संकटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने आता वर्षभराचा प्रपंच कसा चालवायचा असा गंभीर प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे प्रशासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून या चिंताग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्रा. बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.



