केज तालुक्यात वादळी पावसाचा कहर; केळी, ऊस शेतीसह घरांचे प्रचंड नुकसान ;एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, शिवसेनेची तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि तीव्र वादळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीत केळीच्या बागा आणि उसाचे पीक भुईसपाट झाले असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच अनेक जनावरे दगावल्याचीही माहिती आहे.अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे या वादळात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे.या पार्श्वभूमीवर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी,यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांना एक सविस्तर निवेदन दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार
तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,केज तालुक्यातील शेतकरी आधीच संकटात असताना या अवकाळी पावसाने त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत.राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या प्रस्तावांचा गतीने पाठपुरावा करू आणि बाधितांपर्यंत लवकरात लवकर भरघोस मदत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहू असे त्यांनी सांगितले.यावेळी निवेदन देताना नेत्यांची व शिव सैनिकांची उपस्थिती होती.शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागणीसाठी केज तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने शिवसैनिक,पदाधिकारी एकत्र आले होते.यामध्ये प्रामुख्याने खालील नेत्यांचा सहभाग होता.
माजी आमदार तथा शिवसेना उपनेत्या सौ. संगीताताई ठोंबरे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक, शिवसेना तालुका प्रमुख पृथ्वीराज पाटील,विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाने,युवा सेना तालुका प्रमुख दत्तकुमार काकडे, तालुका उपप्रमुख महेंद्र चाटे,योगेश देशमुख, तालुका सचिव विकास काशीद,युवासेना शहर प्रमुख आकाश चाळक,शेतकरी सेना तालुका प्रमुख आदित्य रांजनकर युवासेना उप तालुका प्रमुख ज्ञानेश्वर भांगे, शिवाजी गायकवाड तालुका संघटक, विश्वासराव जाधव ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश गुंड, संतोष बुडूक,अशोक जोगदंड, शिवशंकर नाईकनवरे, अजय तांबे, शुभम गंभीरे,पृथ्वीराज इंगळे,आदेश देशमुख, स्वप्निल पवार,विलास घुले,उमेश माने,बापू गालफाडे,आसिफ शेख, श्रीराम कदम,बब्रुवान इंगळे,महादेव कदम यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागण्यांचे प्रमुख मुद्दे- वादळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे अचूक व तात्काळ पंचनामे करावेत,मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत तात्काळ मंजूर व्हावी,पडझड झालेली घरे आणि दगावलेल्या जनावरांचे तातडीने सर्वेक्षण करून भरपाई मिळावी अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार अशोक भंडारे यांना सादर करण्यात आले.



