प्रशासनाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात वाघोली ग्रामस्थ आक्रमक ;आज शेवगाव पंचायत समिती समोर सामूहिक मुंडण व जनआक्रोश आंदोलन!


शेवगाव/प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५ – २६ च्या तालुकास्तरीय निकालात पारदर्शकता न राखता,जाणूनबुजून डावलल्याचा गंभीर आरोप करत आदर्श ग्रामपंचायत वाघोली ता. शेवगाव येथील सरपंच आणि समस्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी आज शुक्रवार दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी १०-०० वाजता शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर सामूहिक मुंडण आणि जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
‘माझी वसुंधरा’ विजेता गाव ठरला डावललेला!
‘माझी वसुंधरा अभियान २.०/३.०’अंतर्गत प्रथम पुरस्कार प्राप्त असलेल्या आणि राज्य पातळीवर आदर्श काम केलेल्या वाघोली गावाचे काम उत्कृष्ट असूनही,तालुका स्तरीय निकालामध्ये प्रशासनाने हितसंबंध जपत वाघोली गावाला कुठलाही क्रमांक दिलेला नाही,असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक आमच्या कामाचे खच्चीकरण करण्याचा आणि भविष्यातील वाटचालीला खिळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.राज्य पातळीवर आदर्श ठरलेल्या आमच्या गावाला तालुका पातळीवरील निकालात जाणीवपूर्वक डावलून प्रशासनाने अन्याय केला आहे.हा अन्याय वाघोली चे ग्रामस्थ कदापिही खपवून घेणार नाहीत. प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध म्हणून आम्ही सामूहिक मुंडण आंदोलन करत आहोत.
– सौ.सुस्मिता उमेश भालसिंग लोकनियुक्त सरपंच,वाघोली
अन्यथा सर्व जबाबदारी प्रशासनाची!
या आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर व पारदर्शक कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनावर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार शेवगाव, पोलीस निरीक्षक शेवगाव,मुख्य कार्यकारी अधिकारी,अहिल्यानगरआणि जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनाही पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.या आंदोलनात सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो ग्रामस्थ सहभागी होणार असल्याचे समजते.



