मानवी जीवनात अध्यात्म मन:शांती देते तर विज्ञान प्रगती देते.- मठाधीपती ह.भ.प.महंत भगवान महाराज शास्त्री वरपगावकर


केज/प्रतिनिधी
मानवी जीवनात प्रत्येक गोष्टीला आपले महत्व आहे. धावपळीच्या जगात मनःशांती महत्वाची आहे. विज्ञानाची प्रगती शांती देऊ शकणार नाही, त्यासाठी अध्यात्माची गरज आहे.त्याचवेळी मन शांती देणारे अध्यात्म प्रगतीची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्यासाठी विज्ञानाची जोड गरजेची आहे.त्यासाठी आयुष्यात अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून चालणे गरजेचे आहे.
शिवराम पुरी मठ संस्थान भक्तांच्या सेवेत सदैव कार्य करत राहील असे प्रतिपादन शिवराम पुरी मठ संस्थान वरपगावचे मठाधिपती ह.भ.प.महंत भगवान महाराज शास्त्री यांनी काल्याच्या किर्तन प्रसंगी व्यक्त केले.केज तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वरपगावचे शिवरामपुरी मठसंस्थान या भागातील लोकांचे प्रेरणास्थान असून या मठसंस्थांनाने गेली साडेतीनशे वर्षे केलेली समाजाची अद्यात्मिक सेवा भूषणीय असून गेली सहा-सात दशकात मठाधीपती वै. नागेश पुरी महाराज व त्यानंतर वै.रामकृष्ण पुरी महाराज यांनी अध्यात्मिक प्रबोधनाद्वारे मोठे कार्य करून संस्थांनाचे नांव महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पोहोंचवले आहे असे गौरवौद्गागार केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी येथील सप्ताह समारोपाच्या वेळी बोलताना व्यक्त केले.
केज तालुक्यातील वरपगांव येथे शिवराम पुरी मठ संस्थानात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रामकृष्ण महाराज स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.याही वर्षी दि.३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सात दिवस दररोज सायंकाळी ७ते ९ यावेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा पार पडली.सात दिवस दररोज दुपारी २ ते ५ यावेळेत शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. दररोज दुपारी व सायंकाळी उपस्थित भक्तांसाठी येथे अन्नदानाची व्यवस्था मठ संस्थान व वेगवेगळे अन्न दाते यांच्या वतीने करण्यात आली होती.
दि.७ फेब्रुवारी रोजी सप्ताहाची सांगता मठ संस्थांनाचे विद्यमान मठाधीपती महंत ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री वरपगांवकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.यावेळी अनेक महाराज सह आमदार नमिताताई मुंदडा यांच्यासह शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे,राहुल सोनवणे,ऋषिकेश आडसकर,विजयप्रकाश ठोंबरे रत्नाकर शिंदे, सौरभ सोनवणे,सुनील गलांडे,किसनदादा कदम, विष्णू भाऊ घुले, दादासाहेब ससाणे, पृथ्वीराज पाटील, प्रवीणकुमार शेप यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा मठ संस्थांन च्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमा नंतर उपस्थित लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.संस्थानाच्या वतीने सर्व ती अत्यावश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी शुभेच्छा संदेश पाठवला होता.आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी “केज तालुक्यातील वरपगाव च्या मठ संस्थांनाचे कार्य खुप मोठे आहे.केवळ झगमगाट न करता अत्यंत पवित्र अध्यात्मिक प्रबोधन सेवेचे कार्य मठ संस्थान करत आहे.इच्छा असूनही आपण कार्यक्रमाला पोहोचू शकलो नाही मात्र लवकरच मठ संस्थांनाला भेट देणार आहे असे जरांगे पाटील म्हणाले.
रामकृष्ण महाराज याच्या जयजयकाराने वरपगाव नगरी दुमदुमली होती. नंतर अनेकांनी महा प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी व्यापारी बांधवांनी अनेकानी आपले दुकाने थाटली होती.एस टी महामंडळाने बसेसची सोय केली होती.यावेळी भाविक भक्तांचा महापुर दिसुन आला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी हा परीसर स्वच्छता करून नवीन संदेश दिला आहे.



