राजकारणातील वक्तशीर आणि धुरंधर व्यक्तीमत्वाला महाराष्ट्र मुकला

प्रतिक्रिया
आजचा दिवस अतिशय दुःखद बातमीने सुरू झाला महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव असणारे, प्रशासनावर भक्कम पकड असणारे नेते आणि आपल्या स्वभावाने रोख ठोक असणारे मात्र तेवढ्याच ताकदीने काम करणारा नेता म्हणून अजित दादांची ओळख होती मात्र आज दादांच्या अकाली जाण्याने आम्हा पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आमचे आणि पवार परिवाराचे कौटुंबिक स्नेह होते ही बातमी अत्यंत वेदनादायी आहे….
महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेव नेता अजित दादा असे होते की ते पहाटे 5 वाजल्यापासून आपल्या कामाला लागायचे. बिनधास्त, निर्भीड, कणखर आणि योग्य कामास वेळेत आणि भक्कमपणे पाठिंबा देणारे आणि स्पष्ट बोलणारे दादा म्हणून त्यांची राज्यात ओळख होती.
ज्यांनी जवळजवळ 4 दशकांहून अधिक काळ राज्याच्या राजकारणात आपला ठसा कायम ठेवला. योग्य नियोजन, प्रशासनावर पकड, मिश्किल स्वभाव पण कामाच्या बाबतीत कठोर; अस बरंच काही… कायम आपल्या कामात व्यस्त असणारा धुरंधर असा नेता गेला!!
सद्या दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने बीड च्या बाबतीत अनेक विषयांवर दादासोबत चर्चा व्हायची बीड साठी सकारात्मक पद्धतीने अजित दादा सहकार्ये करत होते. कधी नव्हे ते बीड जिल्ह्याने पहाटे 6 वाजताची उद्घाटने, अचानक शासकीय रुग्णालयात भेट असे अनोखे अनुभव दादांच्या माध्यमातून जिल्ह्याने अनुभवली असा सर्वांना सोबत घेऊन चालणारा व जनतेला आणि कामाला प्राधान्य देणारा हा नेता होता आणि ही उणीव कायम राहील.
अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण बेचव असेल….
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
– सौ.रजनी पाटील (खासदार राज्यसभा)



