
बीड/प्रतिनिधी
कापूस,सोयाबीन आदी शेतमालाला वाढीव दर मिळावा, सीसीआय व जिनिंग केंद्रांवरील शेतकऱ्यांची प्रतवारी वरुन होणारी अडवणूक थांबवावी,किमान आधारभूत दरापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच कापूस व सोयाबीन ची परदेशातून होणारी आयात तात्काळ बंद करावी,आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमालाचे आयात निर्यात धोरणात आवश्यक बदल करावेत. अनेक अशा प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी दि.२५ डिसेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालया वर काढण्यात येणाऱ्या शेतकरी हक्क मोर्चा मध्ये शेतकरी,शेतकरी पुत्र, शेतकरी मित्र तसेच शेतकऱ्यांप्रति संवेदनशील सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले.
बीड व गेवराई तालुक्यातील अनुक्रमे घाटसावळी,लिंबागणेश दगडगाव,औरंगपूर (कुकडा),कुक्कडगाव येथे गुरुवारी दि.१८,१९ रोजी शेतकऱ्यांच्या बैठका संपन्न झाल्या.सर्वच गावातील शेतकऱ्यांनी बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बैठकीत शेतकरी हक्क मोर्चाचे आंदोलन समिती सदस्य, राजेंद्र आमटे,सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,माजी सैनिक अशोक येडे, शेतकरी नेते रामेश्वर गाडे , अरूण आबा लांडे, बाळासाहेब मोरे पाटील, सुहास जायभाये,नंदू शिंदे,रामप्रसाद गाडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली.
यावेळी बोलताना कुलदीप करपे म्हणाले की,केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. खाजगी व्यापाऱ्यांकडून किमान आधारभुत दरा पेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी होत असताना पणन विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारने कापसाला १२ हजार, सोयाबीनला ७ हजार प्रति क्विंटल भाव जाहीर करावा. राष्ट्रीयकृषी विकास योजनेतून थकीत असलेले ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान द्यावे, वन्य प्राण्यांपासुन संरक्षण करण्यासाठी शेतीला पक्के ताराचे कंपाउंड करावे,शेत रस्ते,बांध रस्ते निर्विवाद करावेत.
थकीत पीकविमा नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरडून गेलेल्या शेतजमीनीचे पुनर्भरण करून तात्काळ द्यावे, कृषीपंपाला दिवसाअखंड ८ तास उच्च दाबाने वीज द्यावी आदि मागण्यासाठी येत्या २५ डिसेंबर २०२५ रोजी गुरुवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चा आयोजित केला आहे.सर्व शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थितराहण्याचे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे.



