
केज/प्रतिनिधी


बीड जिल्ह्यात ऊस दर वाढीच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन बुधवारी अधिक तीव्र झाले.शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना,येडेश्वरी साखर कारखाना व गंगा माऊली साखर कारखाना यांच्या चेअरमन तसेच संचालकांची भेट घेऊन तातडीने ऊसाचा भाव जाहीर करण्याची विनंती केली.
समितीच्या म्हणण्या नुसार ऊसदर प्रश्नावर कारखानदारांकडून अद्याप स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे शेतकऱ्यां मध्ये तीव्र नाराजी आहे. सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा म्हणून समितीने तिन्ही साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी तसेच वहातूक ठेकेदारांनी तोडणी व वाहतूक तात्काळ थांबवावी,अशी विनंती केली आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाई मोहन गुंड यांनी सांगितले की,ऊस दर वाढ हा शेतकऱ्यांचा हक्क असून योग्य भाव मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. शेतकऱ्यांची व्यथा शासन व कारखानदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघर्ष समिती ठाम भूमिका घेत आहे.दरम्यान,आंदोलना मुळे साखर कारखान्यांच्या कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तसेच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पहाटे माळेगाव येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ची वहातुक थांबवली असल्याचे समजले आहे.



