सामाजिक

मल्टिस्टेट घोटाळ्यात केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी लक्ष घातले ; लिक्विडेटरमार्फत मिळणार पैसे, ठेवीदारांना दिलासा

खा.बजरंग सोनवणे यांनी जिजाऊ, ज्ञानराधा,शुभकल्याण, राजस्थानी पतसंस्थे बाबत मांडला होता संसदेत प्रश्न

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यासह राज्या तील विविध भागात शाखा असलेल्या ज्ञानराधा,जिजाऊ,शुभ कल्याण,जिजामाता व राजस्थानी मल्टीस्टेट पंतसंस्था चालकांनी ठेवीदारांना कोट्यावधीं चा चुना लावलेला आहे. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत,यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत व संसदे बाहेर सतत पाठपुरावा केलेला आहे. खा. बजरंग सोनवणे यांनी संसदेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रभावी मांडणीमुळे या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घातले असून आता ठेवीदारांना लिक्विडेटर मार्फत ठेवी परत मिळतील असे लेखी उत्तरही दिले आहे.

बहु-राज्य सहकारी पतसंस्थांनी ठेवीदारांचे पैसे न परतवल्याबाबत लोकसभा प्रश्नोत्तरात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी महत्त्वाची माहितीदिली. बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी अशा सर्व बहुराज्यीय पत संस्थांमधील ठेवी परत मिळण्यासाठी संसदेमधे प्रश्न उपस्थित करुन या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले होते.सदर संस्थांविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्रीय निबंधकांनी महाराष्ट्र शासनाच्या निबंधकांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.चौकशी अहवाल समाधानकारक नसल्याने या संस्थांवर बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम २००२ अंतर्गत कलम ८६ नुसार विघटन आदेश देण्यात आले असून कलम ८९ नुसार लिक्विडेटर नेमण्यात आले आहे.

नेमण्यात आलेले लिक्विडेटर हे संस्थांची चल/अचल मालमत्ता विक्री करून कलम ९० व नियम २० व २९ नुसार ठेवीदारांना पैसे परत करणार असल्याची माहिती देण्यात आली. सरकारने ठेवीदारांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी २०२३ मध्ये बहु-राज्यसहकारी संस्था सुधारणा कायदा लागू केला आहे.यात सहकारी निवडणूक प्राधिकरण,लोकपाल नियुक्ती,पारदर्शक लेखा परीक्षण,नवीन गुंतवणूक मार्गदर्शक तत्वे,संचालक अपात्रता निकष व फसवणुकीवर कठोर कारवाई अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्यासह इतर भागातील ठेवीदारांना संस्थांच्या मालमत्तेतून कायदेशीररित्या परतफेड मिळणार असून,सरकारने त्यांच्या हितासाठी ठोस उपाय योजना केली असल्याचे केद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी उत्तरात म्हटले आहे.

खा.सोनवणे राहिले ठेवीदारांची पाठीशी उभा

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक मल्टिस्टेटवाल्यांनी सामान्य ठेवीदारांना चुना लावलेला आहे. सदरील प्रकरणात ठेवीदारांनी खा.बजरंग सोनवणे यांची भेट घेवून आमचा प्रश्न संसदेत मांडा,आम्हाला न्याय द्या,असे म्हटले होते. खा.बजरंगसोनवणे यांनी ठेवीदारांचा विचार करून संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. आज केंद्रीय मंत्री यांनी दिलेल्या उत्तरामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला असून ठेवीदारांनी खा.बजरंग सोनवणे यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!