
केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून शेतकरी अतिवृष्टीने त्रस्त झाला आहे .या आलेल्या महाभयंकर पुरामुळे सर्व ग्रामीण भाग व शेती आणि शेतकरी अडचणीत सापडून हवालदिल झाला आहे.त्यामुळे संभाजी ब्रिगेड बीड पूर्व च्या वतीने सत्ताधारी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या घरासमोर जागरण गोंधळ आंदोलन करून नंतर उपजिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देऊन घोषणाबाजी करण्यात आली.तसेच सध्या जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शेतकऱ्यांची पिके तर पूर्णपणे उध्वस्त झालेली आहेतच परंतु पुराच्या पाण्यामुळे शेत जमीन सुद्धा खरडून गेली आहे तसेच अनेक गावच्या गावे पुराखाली गेलेली असल्यामुळे कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाले आहेत.
तसेच,जनावरे आणि गुरेढोरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत.शेती सोबतच घरदार, संसाराला लागणारे सर्व साहित्य आणि मुलांच्या शैक्षणिक साहित्याचे या पुराच्या पाण्यात अतोनात नुकसान झाले आहे.हातामध्ये आलेले पीक पूर्णपणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद कमजोर झाली आहे. चारही बाजूंनी तो भयानक संकटात सापडलेला असून येणाऱ्या काळात निराशा आणि नुकसानी मुळे आत्महत्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशावेळी शेतकरी आणि पूरग्रस्त लोकांना आधार देणे,त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करणे त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहुन त्यांना धीर देणे हे महाराष्ट्राचे जागृत आणि संवेदन शील नागरिक म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहे.त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला ज्या ज्या प्रकारचे सहकार्य या आपत्तीग्रस्तांना करता येईल तेप्रत्येकाने करावे.सर्व स्तरातील लोकांनी या अस्मानी संकटातून सावरण्या साठी शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहाय्य करावे.
आमदार, नोकरदार,व्यापारी, उद्योगपती, समाजातील श्रीमंत वर्ग,सर्व शैक्षणिक संस्था ,सर्व हिंदी-मराठी व इतर चित्रपट सृष्टी ,टिव्ही चॅनल्स आणि सर्व धार्मिक स्थळे यासर्वांनी जेवढी जास्त मदत पैशाच्या , वस्तूंच्या, संसार उपयोगी साहित्याच्या स्वरूपात करता येईल ती केली पाहिजे. सरकारने त्यांच्या मानसिकतेचा गांभीर्याने विचार करून त्यांना या नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी आपली तिजोरी खुली करावी. कोणतेही निकष न लावता व नियमांच्या चाकोरीत न अडकता जनतेला भरघोस मदत करावी.तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी एक लाख रूपये व गुराढोरांच्या बाजार किंमती प्रमाणे मदत करत त्यांना धीर द्यावा.
सरकारने बाकीच्या लोकप्रिय योजनांवर काही काळ अंकुश लावून सध्याची प्राथमिकता ही फक्त आणि फक्त अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना जास्तीतजास्त सहकार्य करणे आहे हे लक्षात घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे आणि संकट ग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची महाराष्ट्राची महान परंपरा कायम ठेवावी ही विनंती यावेळी उपस्थित रामकिसन मस्के सर,विभागीय सदस्य प्रवीण ठोंबरे सर, जिल्हाध्यक्ष शिवश्री राहुल खोडसे, अंबाजोगाई महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई यादव, सतीश कुंडगर,नारायण मुळे,चौधरी उमेश, खोडसे विशाल, कमलाकर चव्हाण, ओमकार पतंगे, जोतिराम माने,पुष्कर रुपदास,अतुल गुजर, केराव टेहेरे,गजानन प्रताप अंबाड,हर्षवर्धन तरकसे,शिवाजी गुजर, मनोज गुजर इत्यादी आंदोलन कर्ते उपस्थित होते.



