
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून,उभ्या पिकांचा पूर्णतः नाश झाला आहे.या पार्श्वभूमीवर महाएनजिओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव ढाकणे यांनी बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
पिकांचे अमाप नुकसान – शेतकरी हवालदिल
श्री.बाजीराव ढाकणे यांनी सांगितले की, सोयाबीन, कापूस, मका, तुर ,भुईमूग व भाजीपाला यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली होती,पण आता उभे पीक पूर्णपणे पाण्या खाली गेले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने अहवाल, पंचनामे व तपासण्यांच्या नावाखाली वेळ घालवू नये,तर तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा.
आश्वासन नव्हे,प्रत्यक्ष कृती हवी
बाजीराव ढाकणे यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहा. केवळ आश्वासनांनी पोट भरत नाही.बीड जिल्ह्यातील सर्व तालुके ओला दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी १ लाख रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे.दौरे व बैठकी पेक्षा प्रत्यक्ष कृती होणे आवश्यक आहे.
पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता
बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतजमिनी जलमय झाल्या असून पिकांचे झालेले नुकसान आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.अशा वेळी शासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल, असे मत श्री बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
जर तात्काळ मदत मिळाली नाही,तर शेतकऱ्यांचा रोष रस्त्यावर येईल,असा स्पष्ट इशारा श्री. बाजीराव ढाकणे यांनी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांचा आवाज आता रस्त्यावरूनच सरकारपर्यंत पोहोचवावा लागेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.



