भारत माता की जय, अमर रहे अमर रहे घोषणा देत मराठा सेवक सतीश देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार

केज/प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अंतरावली सराटी ते मुंबई निघालेल्यामोर्चात सहभागी झालेले बीड जिल्ह्यातील वरपगाव ता.केज येथील मराठा सेवक स्व.सतिश ज्ञानोबा देशमुख यांचा हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने पुणे जिल्ह्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांच्यावर कर्ज आहे आणि ते अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्यांच्या मुलाचा समावेश सरकारी नोकरीत करण्यात यावा तो पर्यंत स्व.सतिश देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती.शासनाचा आदेश आल्या नंतर त्या बाबत प्रस्ताव पाठवून देण्या संदर्भात तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील वरपगाव ता.केजयेथील सतीश ज्ञानोबा देशमुख या ४५ वर्षीय तरुणाचा मनोज दादा जरांगे यांच्या आंतरवलीसराटी ते मुंबई या मराठा आरक्षण मागणीसाठी निघालेल्या मोर्चात सहभागी असताना दि. २८ऑगस्ट रोजी सकाळी ९-०० वाजता त्यांना जुन्नर येथे हृदय विकाराचा झटका आला.त्या नंतर त्यांना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील रुग्णालयात मृत्य झाला होता.मृत्यू झाल्याचे समजताच मनोज दादा जरांगे यांनी नारायणगाव येथील रूग्णालयात जाऊन त्यांच्या भावाचे सांत्वन केले.दरम्यान सतीश देशमुख यांचे पार्थिव वरपगाव येथे आणण्यात आले असून दि.२९ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ९-०० वाजता अंत्यविधी होणार असल्याचे जाहीर केले होते.मात्र दि.२८ ऑगस्ट रोजी रात्री ९-००वाजण्याच्या सुमारास वरपगाव येथील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की,सतीशदेशमुख यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे.तेअल्प भूधारक शेतकरी असून त्यांच्यावर सेवासहकारी सोसायटीचे कर्ज आहे. त्यामुळे सतीश देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा.त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी देण्यात यावी.जो पर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीत समावेश होत नाही.तो पर्यंत स्वर्गीय सतिश देशमुख यांच्या पार्थिवा वर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय वरपगाव येथील ग्रामस्थानी घेतला होता.
यासंदर्भात गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देखील दिले होते.दि. २९ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचे पार्थिव नारायणगाव येथून आणण्यात आल्या नंतर ते केज उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते.दरम्यान तहसीलदार राकेश गिड्डे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन शासनाकडून मुलाच्या नोकरी संदर्भात आदेश प्राप्त झाल्या नंतर त्याचा अहवाल पाठवीला जाईल आणि त्याचा पाठपूरावा केला जाईल असे आश्वासन केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिल्या नंतर दुःखद वातावरणात सतीश देशमुख यांच्यावर वरपगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.यावेळी वरपगाव मठ संस्थानचे मठाधिपती भगवान महाराज शास्त्री,माजी आमदार सुनील धांडे, तहसीलदार राकेशगिड्डे, डॉ.टी.एल देशमुख, पांडुरंग आवारे पाटील, पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे,पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनेउपस्थित होते.केज तालुक्यातून सकल बहुजन मराठा समाज बांधवही खूप मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
माझे चुलते सतीश देशमुख यांचा एक मुलगा पूर्वी विजेचा शॉक लागून मृत्यू पावला आहे.तर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आणि वाईट असल्याने त्यांच्या लहान मुलाला न्याय देऊन त्याला सरकारी नोकरी द्या.- जयदीप देशमुख (पुतणे)



