संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती निमित्त राज्यभर उत्सव साजरा करण्याचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५० वी जयंती वर्ष असून,येत्या गोकुळ अष्टमी दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची ७५० वी जयंती साजरी होणार आहे.या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर परिषदा यांनी संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमा किंवा मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून सार्वजनिक रीतीने हा महोत्सव साजरा करावा,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरीस्थानिक स्वराज्य संस्थांनी या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि उत्सवाच्या आयोजनात आवश्यक ती दक्षता घ्यावी,असेही शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.शासनाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक दि.३० जुलै २०२५ रोजी जाहीर केले असून,नगरविकास विभागाचे अपर सचिव अनिलकुमार आर.उगले यांच्या सहीने हे परिपत्रक प्रसारित करण्यात आलेले आहे.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावे आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा गौरव करावा असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान या शासन निर्णयाचे समस्त ब्राह्मण संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.धनंजय कुलकर्णी यांनी स्वागत केले असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले आहेत. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.



