गप्पेवाडीतील पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर ; दोन सरकारी पाईपलाईन असूनही बाराभाई व महादेव वस्त्यांवर अन्याय प्रशासनाचा घाणेरडा कारभार?

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील गप्पेवाडी गावात पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.गावामध्ये दोन-दोन सरकारी पाईपलाईन व्यवस्था अस्तित्वात असतानाही बाराभाई वस्ती आणि महादेव वस्ती येथील नागरिकांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.विशेष म्हणजे गावाच्या मुख्य भागात मुबलक पाणीपुरवठा होत असताना या दोन वस्त्यांकडे मात्र प्रशासनाचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते,गप्पेवाडी मध्ये जल पुरवठ्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून पाईपलाईन उभारल्या आहेत.परंतु या पाईपलाईनचा लाभ सर्वांना समान पद्धतीने मिळत नाही.
गावातील काही भागात नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा केला जातो,तर बाराभाई वस्ती आणि महादेव वस्ती येथील नागरिकांना एकदा पण नळांला पाणी मिळत नाही याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. महिलांना दररोज लांब अंतरावरून पाणी आणावे लागते,त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात. अनेक वेळा शाळकरी मुलांनाही पाणी भरण्या साठी जावे लागते, त्यामुळे त्यांच्या शिक्षणा वरही परिणाम होत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ही समस्या अधिकच वाढली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.गावातील काही नागरिकांनी सांगितले की,अनेक वेळा ग्राम पंचायत आणि संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ठोस उपाय योजना करण्यातआलेली नाही.पाईपलाईन असूनही पाणी पोहोचत नसल्यामुळे नेमकी अडचण कुठे आहे? याचा शोध घेऊन त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान,काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये गळती, कमी दाबाने पाणी येणे किंवा अनधिकृत जोडणी यांसारख्या समस्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,तसेच सर्व वस्त्यांना समान पाणीपुरवठा सुनिश्चित करावा,अशी मागणी होत आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. गप्पेवाडी तील बाराभाई वस्ती आणि महादेव वस्ती येथील नागरिकांना न्याय मिळावा,यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा येत्या काळात नागरिकांकडून तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.



