
केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात गाजत असलेल्या घरकुल घोटाळ्यानंतर केज नगरपंचायत आता पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शहरात भीषण पाणी टंचाई असताना लोक प्रतिनिधी आणि प्रशासन मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे.धरण उशाला अन् कोरड घशाला अशी परिस्थिती आहे.धनेगाव तलावात पाणी उपलब्ध असताना ही अपुरी साधन व्यवस्था असल्याचे कारण पुढे करून केजकरांना ऐन उन्हाळ्यात निर्जळीचा सामना करावा लागत आहे.तसेच उमरी रोडवरील गणेश नगर भागातील सार्वजनिक बोअर वर एका रहिवाशाने अनधिकृत ताबा मिळवूनही, मुख्याधिकारी श्री.धोपे यांनी कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मागच्या काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी गणेश नगर भागात एक सार्वजनिक बोअर घेऊन त्यावर हातपंप बसवण्यात आला होता.मात्र,काही दिवसांतच तो नादुरुस्त झाला.याचाच फायदा घेत एका स्थानिक रहिवाशाने हासार्वजनिक बोअर आपली खाजगी मालमत्ता असल्या सारखा वापरण्यास सुरुवात केली.त्याने चक्क हातपंप काढून तिथे स्वतःची मोटार बसवली असून,संपूर्ण बोअरवर कब्जा मिळवला आहे.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची फक्त ‘बघ्याची’ भूमिका
गणेश नगर भागातील नळ योजना पूर्णपणे कोलमडली आहे. रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना,सार्वजनिक मालमत्तेवर एका व्यक्तीचा ताबा असणे हा गंभीर प्रकार आहे. याबाबत रहिवाशांनी मुख्याधिकारी श्री.धोपे यांच्याकडे गेल्या दोन महिन्यांत २० ते २५ वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या.मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी केवळ आज करतो,उद्या करतो अशी राजकीय उत्तरे देऊन नागरिकांची बोळवण केली आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
लोकप्रतिनिधींना केवळ मतांचे राजकारण करायचे आहे,पण शासनाने नेमलेल्या मुख्याधिकाऱ्यांचे काय?
त्यांनी तरी नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित होते.मात्र,त्यांनी जनतेला वेड्यात काढण्याचे काम केले आहे.-त्रस्त रहिवासी, गणेश नगर.
नगरसेविका आणि नगराध्यक्षांचेही दुर्लक्ष
प्रभागाच्या नगरसेविका, त्यांचे कारभारी पुत्र आणि नगराध्यक्ष यांच्या कडेही वारंवार तक्रारी करूनही काहीच निष्पन्न झाले नाही.एकीकडे केजमधील कोट्यवधीं च्या घरकुल घोटाळ्याची चौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे,
आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार
नगरपंचायत स्तरावर न्याय मिळत नसल्याने, गणेश नगरमधील संतप्त रहिवाशांनी आता येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बोअरवरील अनधिकृत कब्जा हटवून तो सर्वांसाठी खुला करावा आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



