दोनशे वर्षापूर्वीच्या महा वटवृक्षाचे पुर्नरोपण ; वृक्ष मित्रांचा पुढाकार
शेवटच्या श्वासापर्यंत वृक्ष संवर्धनाचे काम करणार--- वृक्षमित्र सुधाकर देशमुख

केज /प्रतिनिधी
आंबेजोगाई कळंब राज्य मार्गाचे रुंदीकरण काम सुरू झाले आहे. यामुळे पालखी मार्गावरील हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. रुंदीकरणानंतर नवी रोपे लावण्यात येणार आहेत असा फतवाही निघालेलाआहे. क्रांती दिन, रक्षाबंधन असा दुहेरी संगम शनिवार दि ९ रोजी होता.त्यादिवशी बोरीसावरगाव जवळ महेश मुळे यांच्या हॉटेल समोरील दोनशे वर्ष जुने वडाचे अंदाजे पंचवीस फूट आकाराचे झाड पोकलेन च्या साह्याने काढून त्याचे दुसऱ्या जागी पुनर्रोपण करण्यात आले.
अशोक संगवे यांच्या हॉटेल समोरील पावणे दोनशे वर्षाचे जुने वडाचे झाड काल पुनर्रोपण करण्यात आले.वृक्षमित्र अभियानचे सुधाकर देशमुख,डॉ हनुमंत सौदागर, सरपंच वैजनाथ देशमुख,ॲड अनंत सोनवणे,महेश मुळे ,योगेश देशमुख, नवनाथ अंबाड,अशोक संगवे,संतोष मुळे,राजेभाऊ पारेकर,दत्ता काकडे बंटी धिरे, विशाल बीडकर, यश कन्स्ट्रक्शन करण उजगरे,अशोक धायगुडे,विशाल गोरे,शाहीर तुकाराम सुवर्णकार, वसुदेव गायकवाड, मोनू देशमुख बाबासाहेब कोकाटे आदींच्या पुढाकारातून दोन वटवृक्षाचे पुनर्रोपण करण्यात आले. या जुन्या वटवृक्षांना यामुळे जीवदान मिळाले आहे.
असे केले पुर्नरोपण :-
बुडाचा आकार गोलाई पस्तीस फूट असलेला हा महा वटवृक्ष होता. पोकलेन मशीनने वडाच्या सभोवताली मोठा खड्डा घेऊन झाड अलगत बाजूला काढण्यात आले. दुसऱ्या ठिकाणी २५ फुट रुंद व १५ फूट खोलीचा मोठा खड्डा घेऊन त्यामध्ये गांडूळ खत टाकले. वडाच्या खोडावर लिक्विड लावले गेले आणि त्यानंतर जशास तसे मुळासकट खोड त्या खड्ड्यात रोपण करण्यात आले.
त्या वटवृक्षाचे पुनररोपण केल्यानंतर त्याची पूजा करून आनंद व्यक्त करण्यात आला. रोपे लावा झाडे जगवा अशी घोषणाबाजी करण्यात आली. वृक्ष प्रेमींनी वडाच्या झाडाला आलिंगन दिले . आजोबाच्या काळातील हा मोठा वटवृक्ष काढला जातो आहे यामुळे दुःख आणि वेदना झाल्या. वटवृक्षाचे पुनर्पण करून आजोबांच्या आठवणी जपत आहोत महेश मुळे.

महामार्गावरील अशी मोठी वडाची झाडे वाचवण्यात यावीत यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेले आहे. शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. लोकचळवळ आणि लोकसहभागातून जुन्या झाडांचे पुनर्रोपण काम सुरू केले आहे. यापूर्वी अनेक वेळा उपोषण आंदोलन करूनही वृक्ष गणना आणि पुनर्रोपणाचे काम दुर्लक्षित आहे वड,नांदूरकी,पिंपळ अशी या मार्गावरील ५० हून अधिक झाडे पुनर्रोपण करता येतील.या महामार्गावरील अनेक वडाची झाडे वाचवता येतील. मोठ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात यावे सामाजिक वनीकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हे काम करायला हवे वृक्षमित्र अभियान सुधाकर देशमख वटवृक्षाचे पुनर्रोपण करणे काळाची गरज असल्याचे मत वृक्षप्रेमी डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले. रस्त्याच्या दुतर्फा असणारी भली मोठी वडाची शेकडो झाडे काढले जात आहेत त्यामुळे रस्ता वसाड बनतो आहे तात्काळ त्या रस्त्याच्या दुतर्फा नवीन वटवृक्षाची लागवड करायला हवी.



