
केज/प्रतिनिधी
केज पंचायत समितीच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. विविध शासकीय योजनांच्या फायली पुढे नेण्यासाठी ‘वजन’ ठेवावे लागते,अशी तक्रार काही लाभार्थ्यांनी केली आहे. पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या जनतेची कामे वेळेवर होत नसल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
शासकीय योजना पासून विविध परवानग्या तसेच दैनंदिन प्रशासकीय कामासाठी नागरिकांना वारंवार पंचायत समिती कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेक वेळा आवश्यक कागदपत्रे पूर्ण असूनही फाईल पुढे सरकत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.वजन ठेवल्याशिवाय कागद हलत नाही असा थेट आरोप लाभार्थी नागरिकांकडून करण्यात येत असल्याने पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक जनतेचे म्हणणे आहे की,शासनाच्या विविध लाभदायक योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.सतत होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी,गोरगरीब लाभार्थी तसेच एकंदर सर्वसामान्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून प्रशासनाने या अनागोंदी कारभाराला आळा घालावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे.लोकांच्या वाढत्या नाराजीमुळे कारभारात पारदर्शकता आणणे व तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
वाढत्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी तसेच पंचायत समितीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी परिणाम कारक तक्रार निवारण व्यवस्था उभा करावी असा ठाम आग्रह व्यक्त केला आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता आहे.नागरिकांच्या सुविधांसाठी कार्यप्रणाली अधिक पारदर्शक करण्याची मागणी केली जात आहे.



