कपिलधारवाडीत जमीन खचली; तातडीने सर्वेक्षण करा खा.बजरंग सोनवणे यांचे भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाला पत्र

बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील पाली ग्रामपंचायत हद्दीतील कपिलधारवाडी परिसरात निर्माण झालेल्या जमिनी तील भेगा व जमीनखचणे या गंभीर भूगर्भीय परिस्थितीवर तातडीने वैज्ञानिक भूगर्भ सर्वेक्षण करण्यात यावे,असे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी महानिदेशक,भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (GSI), भारत सरकार,नवी दिल्ली यांना दिले आहे.
खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे, कपिलधारवाडी गाव व त्याच्या परिसरात (पाली ग्रामपंचायत) गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गंभीर भूगर्भीय स्थिती निर्माण झालेली आहे,या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अलीकडच्या काही दिवसांत या परिसरात जमिनीत मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले असून त्या झपाट्याने वाढत आहेत.अनेक ठिकाणी जमीन खचल्याचेही स्पष्ट दिसते. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतजमिनी, घरं,सार्वजनिक रस्ते इत्यादींना संभाव्य धोका निर्माण झाला आहे.या घडामोडींच्या स्वरूपा वरून हे स्पष्ट होते की या भागात अनपेक्षित व धोकादायक भूगर्भीय बदल होत आहेत.या परिस्थितीच्या गांभीर्याचा तातडीने विचार करून भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (GSI) केंद्रा तील तज्ञांची टीम तातडीने पाठवून कपिलधारवाडी परिसर व आजूबाजूच्या भागाचा सखोल भूगर्भीय व भू-तांत्रिक सर्वेक्षण करावे.
या सर्वेक्षणाद्वारे भूस्खलन व भेगा पडण्या मागील शास्त्रीय कारणे शोधावीत व तात्काळ प्रतिबंधक व सुधारात्मक उपाय सुचवावेत. आवश्यक असल्यास पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्याशी समन्वय साधून बाधित क्षेत्रातील सुरक्षिततेची खात्री करावी आणि पुढील मानवी व पर्यावरणीय हानीटाळावी.
या विषयाचे आपत्तीजन्य व तातडीचे स्वरूप लक्षात घेऊन या प्रकरणास प्राधान्य देऊन आपल्या प्रादेशिक तसेच केंद्रीय विभागांतून तातडीने कार्यवाही करावी,असेही खा.बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.याचआशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेन्द्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री. अजित दादा पवार यांना देऊन या गंभीर बाबीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे.



