२३ जून रोजी एकल महिला दिवस म्हणून साजरा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश ; राज्य सरकारची सकारात्मक भूमिका – सौ.आशाताई बाजीराव ढाकणे

बीड/प्रतिनिधी
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन राज्यातील सर्व महापालिका,नगर पालिका,नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये एकल महिला दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी दिले आहेत.
तसेच प्रत्येक गाव व शहरातील एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमात निमंत्रित करावे आणि त्यांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींनी विशेष ठराव मंजूर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून,या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांच्या साठी आवश्यक असलेल्या उपाययोजनां बाबत महत्त्वपूर्णबैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव,आयुक्त माधवी सरदेशमुख,आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव व्ही.आर. ठाकूर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणा साठी विविध उपाय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.शासन स्तरावर स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असून, त्यातूनविधवा,परित्यक्ता, घटस्फोटित व इतर एकल महिलांना न्याय, सन्मान आणि स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा सौ. आशाताई ढाकणे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना साऊ एकल महिला समितीचे बीड जिल्हा समन्वयक तसेच लेक लाडकीअभियानाचे बीड जिल्हा समन्वयक श्री.बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.एकल महिलांच्या प्रश्नांकडे शासनाने संवेदनशीलतेने पाहण्यास सुरुवात केली असून, स्वतंत्र धोरणाची प्रक्रिया आणि २३ जून रोजी एकल महिला दिवस साजरा करण्याचा निर्णय हा एकल महिलांच्या सन्मानाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा आहे.या माध्यमातून समाजात सकारात्मक जनजागृती होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही एकल महिलांच्या सक्षमीकरणा साठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
एकल महिलांच्या सन्मान,सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी शासनाने घेतलेले हे पाऊल राज्यातील लाखो एकल महिलांसाठी दिलासादायक ठरेल, असा विश्वासही सौ. आशाताई ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.



