दिपाली राऊत राष्ट्रीय युवा चेतना पुरस्काराने सन्मानीत, चिंचोली माळी च्या शिरपेचात मानाचा तुरा

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहीवाशी कु.दिपाली सरिता राजेंद्र राऊत या युवतीला काव्यमित्र संस्थेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त पुणे येथे राष्ट्रीय युवा चेतना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.याविषयी सविस्तर वृत्त असे की,जिद्द, चिकाटी,मेहनत व सातत्यपुर्ण प्रयत्नाने ग्रामीण भागात राहुन, तसेच वडिलांचे छत्र हरपलेले असताना देखील न डगमगता स्वतः च्या पायावर उभारण्याची आस मनी बाळगून केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहीवाशी कु.दिपाली राऊत हिने शेवग्याच्या पाल्यापासुन मोरींगा पावडर,कडीपत्ता पावडर तसेच वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन तारिणी उद्योगसमुहाच्या माध्यमा तून सुरु केले आहे.
आणि या उद्योग समुहाची यशस्वी वाटचाल चालू आहे.याची दखल घेऊन पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवाचेतना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री.राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर संस्थापक अध्यक्ष, काव्यमित्र संस्था हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.संभाजीराजे जाधवराव (सिंदखेड राजा),राजे लखोजी जाधवराव यांचे १४ वे वंशज हे होते.व मा.श्री. व्ही.जे.वाघमारे सर राज्याध्यक्ष-विस्तार अधिकारी पंचायत समाजकल्याण व आय.आर.डी. पी.संघटना यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय युवाचेतन पुरस्कार हा मानाचा पुरस्कार तारिणी उद्योग समूहाला प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना हा पुरस्कार आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण आहे.समाजासाठी गुणवत्ता,प्रामाणिकपणा आणि स्वावलंबन या तत्त्वांवर काम करत राहण्याची ही मोठी पावती आहे.या सन्माना बद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार. भविष्यातही अधिक जोमाने आणि निष्ठेने कार्य करत राहू,हीच ग्वाही.तारिणी उद्योग समूह आपल्या विश्वासा साठी सदैव कटिबद्ध राहणार असे आश्वासन कु.दिपाली राऊत हिने दिले आहे.



