मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे – सुजाता पोहरे यांचे सरकारला निवेदन

नागपूर/प्रतिनिधी
देशातील विविध राज्यां मध्ये व विद्यापीठांना महापुरुषांची नावे देऊन त्यांच्या विचारांचा वारसा जपला जात असताना, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे,अशी ठाम आणि सशक्तमागणी अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या ज्येष्ठ नेत्या सुजाता पोहरे यांनी सरकारकडे केली आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व लोकशाही मूल्यांना दिशा देणाऱ्या कार्याची दखल घेत,त्यांच्या नावाने विद्यापीठ नामकरण होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमी वर सुजाता पोहरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच वित्त व नियोजन,कृषी मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार मंत्री आशिष जयस्वाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.मुंबई विद्यापीठास लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे,अशी स्पष्ट मागणी यानिवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,अण्णा भाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते,तर शोषित-वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे लोकशाहीर होते. त्यांच्या कथा,कादंबऱ्या, पोवाडे आणि लोककले तून सामाजिक समतेचा, मानवतेचा आणि संघर्षाचा संदेश त्यांनी समाजापर्यंत पोहोचवला. अशा महापुरुषाच्या नावाने देशातील अग्रगण्य विद्यापीठाचे नामकरण झाल्यास नव्या पिढीला त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळेल आणि महाराष्ट्राची सामाजिक-सांस्कृतिक ओळख अधिक ठळक होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या वेळी सुजाता पोहरे यांच्यासोबत शिष्टमंडळात मास्तर नितेश कराळे,दत्ता पाटील खानसोळे,अनिल इंगोले देशमुख,सोपान नकुले शेलवाडीकर, नारायण गोटमुकले भेंडेगावकर तसेच अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स चे संस्थापक बा.रा. वाघमारे यांचा समावेश होता.शिष्टमंडळाने सरकारकडे ही मागणी केवळ भावनिक नव्हे तर ऐतिहासिक न्यायाची बाब असल्याचे ठासून सांगितले.
सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा,अशीअपेक्षा व्यक्त करत सुजाता पोहरे यांनी सांगितले की,अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मुंबई विद्यापीठाचे नामकरण झाल्यास ते महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या परंपरेला साजेसे ठरेल.या मागणी ला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून,लवकरच यावर ठोस निर्णय होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.



