हक्काच्या जमिनीच्या लढ्यासाठी आमरण उपोषण पेटले ; आझाद क्रांती सेनेचा ठाम पाठिंबा

केज/प्रतिनिधी
जमिनीची कायदेशीर मोजणी करून जमिनी वरील अतिक्रमण हटवावे, या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आताजोरदार पाठिंबा मिळत आहे.दि.९ डिसेंबर पासून सुरू असलेल्या या उपोषणाच्या ठिकाणी वयोवृद्धांसह महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित असून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला आझाद क्रांती सेनेनेही अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,मा. न्यायालयाच्या आदेशा नुसार सर्व्हे नं.३०/१ व ३०/२ मधील मिळालेल्या जमिनीची त्वरित जमिनीची मोजणी करून सीमा निश्चित करावी.
सदरील जमिनीवरील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवावी. याकरिता या उपोषणात श्रीमंत लांडगे, बळी श्रीमंत लांडगे, शांताबाई श्रीमंत लांडगे, महादेव श्रीमंत लांडगे, नेहा बळी लांडगे,वैष्णवी महादेव लांडगे,संध्या शंकर लांडगे व इतर कुटुंबीय सहभागी आहेत. “हक्काच्या न्यायासाठी” या घोषवाक्याखाली हे कुटुंब सलगपणे उपोषण करत आहे. उपोषण कर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व्हे नंबर ३०/१ व ३०/२ मधील त्यांच्या हक्काच्या जमीन भागात अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले असून,त्याबाबत वारंवार प्रशासनाला कळवूनही योग्य तो निर्णय होत नाही.
न्यायालयाच्या आदेशा नंतरही अधिकृत मोजणी न झाल्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर आझाद क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,हक्काच्या जमिनी बद्दल न्याय मिळेपर्यंत आम्ही या उपोषणाला ठाम पाठिंबा देणार आहोत.प्रशासनाने तातडीने मोजणी करून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी.दरम्यान, उपोषणाचा पहिला दिवस सुरू असून परिस्थिती गंभीर होण्या अगोदर त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपोषणात लहान मुले आणि महिला असल्यामुळे सध्यातरी उपोषणकर्त्यांचे आरोग्य स्थिर असून स्थानिक नागरिकांमध्येही चिंता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून पुढील पावले काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जमिनीवरील वाद सोडवण्यासाठी तातडीने पुढाकार घेऊन न्याय मिळवून देणे अत्यंत गरजेचे असल्याची भावना केजकर व्यक्त करत आहेत.न्याय मिळे पर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील,असानिर्धार व्यक्त करत उपोषण कर्त्यांनी प्रशासनाकडे तातडीच्या निर्णयाची मागणी केली आहे.



