जीवाचीवाडी येथे विहीर लाभार्थी निवडीत गैरप्रकार ; ग्रामसभा घेण्याची मागणी.

केज/प्रतिनिधी
जीवाचीवाडी ता.केज, जि.बीड येथे विहीर योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत गटविकास अधिकारी यांच्या प्रतिनिधी समक्ष ग्रामसभा घेऊन व्हिडीओ चित्रीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराची सखोल चौकशी करण्याची मागणीही पुढे आली आहे.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुभाष सखाराम सारुक जीवाचीवाडी यांनी संबंधित प्रशासनाकडे लेखी अर्ज सादर केला आहे.
अर्जात नमूद केल्याप्रमाणे,योग्य लाभार्थ्यांना विहिरींचा लाभ देण्याबाबत अनेक वेळा मागणी करूनही सरपंच व सरपंच पती कडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप आहे.तसेच ग्रामसभेत उपस्थित राहण्यास अडथळेआणले जात असून,पोलीस बंदोबस्तात ग्रामसभेत जाण्याची परवानगी द्यावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.
गावातील नागरिकांना पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत झालेल्या कामांची माहिती मिळत नसल्याचे सांगून, ग्रामपंचायतीचा कारभार कागदोपत्रीच चालत असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.जीवाचीवाडी हे डोंगराळ भागातील गाव असून बहुतांश शेतकरी अडचणीत असल्याने, काही गावकऱ्यांवर हाताशी धरून सरपंच पतीकडून दबाव टाकला जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी यांच्याप्रतिनिधी मार्फत ग्रामपंचायतीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच योग्य लाभार्थ्यांना विहिरींचा लाभ द्यावा, अशी मागणी अर्जदार व ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाकडून यावर काय कारवाई होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



