
केज/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे व त्यांच्या सुप्त स्वप्नांना नवे पंख मिळावेत,या उदात्त हेतूने पुणे येथील स्नेहछाया परिवार सामाजिक संस्थेच्या वतीने बीड जिल्ह्यातील व केज तालुक्यातील गोटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या,पेन, दप्तर तसेच इतर आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले.या मदती मुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून पालकांनी ही समाधान व्यक्त केले आहे.पुण्या सारख्या शहरी भागातून थेट बीडच्या दुष्काळी ग्रामीण भागात मदतीचा हात पुढे केल्याबद्दल स्नेहछाया परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.यावेळी स्नेहछाया परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री.दत्तात्रय इंगळे, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक व शिक्षक मोहिते सर, चव्हाण मॅडम व पवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिक्षकांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, अशा सामाजिक उपक्रमां मुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होते आणि समाज आपल्यासोबत आहे,ही भावना त्यांच्या मनात बळावते.या कार्यक्रमा साठी सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते अक्षय बचुटे गोटेगावकर यांनी विशेष पुढाकार घेतला.त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सामाजिक चळवळीची दिशा मिळाली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
स्नेहछाया परिवाराच्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला असून, शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोटेगाव येथील ग्रामस्थ,शाळेचे कर्मचारी व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.



