स्वामी विवेकानंद शाळे मध्ये दहावी निरोप समारंभ,शिक्षक पालक मेळावा तसेच करियर गाईडन्स कार्यक्रम संपन्न विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे- प्रा.सच्चिदानंद घोणसे पालकांनी बदलत्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे- अंकुशरावजी इंगळे

केज/प्रतिनिधी
दि.१४ फेब्रुवारी रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग ] या शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ,शिक्षक पालक मेळावा तसेच करियर गाईडन्स हा तिहेरी कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष,जीवन विकास शिक्षण मंडळ तथा सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती केज,तर प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर येथील सच्चिदानंद घोणसे अध्यक्ष,श्री.साई शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर तथा संचालक,घोणसे मॅथ अकॅडमी अहिल्यानगर हे उपस्थित होते.
इतर उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेचे सचिव तथा मार्गदर्शक जी.बी.गदळे, संस्थेचे संचालक विलास जोशी,संस्थेचे सहसचिव तथा स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल केजचे मु.अ.उपेंद्र कोकीळ, स्वयंअर्थ शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायणराव अंधारे,शालेय व्यवस्थापन समिती मा.वि.च्याअध्यक्षा शैलाताई इंगळे,शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,प्रा.वि.चे मु.अ.वसंत शितोळे,स्व.प्रमोद महाजन क.म.चे प्राचार्य शंकर भैरट,स्वयंअर्थ शाळेचे मु.अ.संघपाल मस्के,सोमनाथ गुंड, तसेच ज्ञानसागर अकॅडमीचे संचालक प्रा. शिनगारे सर,प्रा.वायबसे सर,प्रा.दीक्षित सर,प्रा. डॉ.तिवारी सर,प्रा.सौ सुनीता मुंडे मॅडम तसेच प्रा.मनोज पाटील संचालक,सह्याद्री इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज अहिल्यानगर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रबोधकांत समुद्रे तसेच सातवी अ या वर्गातील विद्यार्थी यांनी गंध सुगंधी फुलमालाने अतिथींचे या करू चला स्वागत स्वागतम सुस्वागतम. हे गीत गाऊन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव जी.बी.गदळे यांनी दिला याप्रसंगी ते म्हणाले,सर्व विद्यार्थी निश्चितच परिश्रम घेत असतात,पण काही विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही ध्येय प्राप्तीसाठी अथक परिश्रम घेत असतात. परंतु आजची शिक्षण प्रक्रिया अत्यंत खर्चिक बनली आहे.सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी ठेवणे हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.तेंव्हा या वर्षी परिसरातील विद्यार्थ्यांना इथेच पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.याचा पालकांनी निश्चित विचार करावा.
पुढे दहावीतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,यामध्ये आकांक्षा सांजूरे,आकांक्षा करपे, ऐश्वर्या घुले,अनुष्का वाळके याप्रसंगी त्यांनी अत्यंत भावनिक होऊन हृदयस्पर्शी विचार आपले मनोगतातून व्यक्त केले. त्यांनी शिक्षक व शाळेप्रती आभार सुमने मांडताना काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.शाळेतील शिक्षकांच्या वतीने दत्ता सत्वधर सर यांनी दहावी च्या उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यातील आपली दिशा कशी असावी याविषयीचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.सच्चिदानंद घोणसे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, माझे शिक्षण देखील अत्यंत खडतर परिस्थिती मध्ये झाले.घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे वयाच्या अठराव्या वर्षापासून मला कोचिंग क्लास या क्षेत्रामध्ये यावे लागले.या क्षेत्रामध्ये जवळपास अठ्ठावीस वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य करत आहे.
त्यामुळे अनुभवातून व आत्मविश्वासाने उपस्थित पालकांना मी सांगू इच्छितो की, पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा पाल्यावर लादू नयेत.त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. कारण शिक्षणापेक्षा पाल्य चांगला माणूस म्हणून जगला पाहिजे.गुणवत्ता ही गुणांवर नसते तर ती चारित्र्यावर असते. शक्यतो पाल्यांनामोबाईल पासून दूर ठेवावे.कारण मोबाईल हे व्यसन बनले आहे.विद्यार्थ्यांनी निश्चितच मोठी स्वप्ने पहावीत पण ते पूर्ण करण्यासाठी तसे प्रयत्नही करावेत.शेवटी ते म्हणाले की,खरंतर विद्यार्थ्यांना शिक्षा ही त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व सुधारण्याच्या दृष्टिकोनातून झालीच पाहिजे.
ज्ञानसागर अकॅडमीचे संचालक प्रा. शिनगारे सर याप्रसंगी बोलताना म्हणाले, ज्ञानसागर या अकॅडमी च्या माध्यमातून आठवी ते दहावी फाउंडेशन तसेच अकरावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईच्या विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल.कारण मागील अठ्ठावीस वर्षांपासून ही अकॅडमी अध्यापनाचे कार्य करत आहे.अहिल्यानगर,लोणी, उदगीर इथे या अकॅडमी च्या मुख्य शाखा आहेत. याप्रसंगी त्यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची ते शंभर टक्के यशस्वी होतील या दृष्टिकोनातून अकॅडमीच्या नियोजनाची रूपरेषा ही उपस्थित पालकांपुढे मांडली.अध्यक्षीय समारोपात अंकुशरावजी इंगळे म्हणाले की,या शाळेतील विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण घेऊन आपल्या शाळेचे नावलौकिक करतात. त्याचा निश्चितच सार्थ अभिमान वाटतो. शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे फळ,विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतून दिसून येते.
खरंतर आजच्या काळामध्ये शहरातील परिस्थिती पाहता विद्यार्थी हा पालकांसोबत असणे जास्त गरजेचे वाटते. आणि पालकांनीही परिस्थितीनुसार बदल करून घेतला पाहिजे. तेंव्हा यावर्षी आपल्या शाळेमध्ये ज्ञानसागर अकॅडमीमुळे तसा पर्यायही उपलब्ध झालेला आहे.इथेच प्रवेश घेतल्यामुळे पाल्य व पालक एकत्रित राहू शकतील.शिवाय सामान्य कुटुंबातील मुलांनाही शिक्षण घेण्याची संधी मिळेल.तसेच पुढे याप्रसंगी पालकांनी उपस्थित केलेल्या सूचनांचेही लवकरात लवकर निराकरण करू असे उपस्थित पालकांना आश्वासित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांनी मानले.



