
केज/प्रतिनिधी
केज शहरातील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ केज संचलित,केज शहरातील नालंदा विद्यालय येथे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.नंदकुमार मस्के सर तर प्रमुख प्रमुख वक्ते म्हणून श्री.नवनाथ कांबळे सर उपस्थित होते.
सर्व प्रथम परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीप, धूपाने,व पुष्पाने पूजन करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिन वाघमारे सर यांनी केले प्रस्ताविकानंतर शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन बचके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अभिवादन पर आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक कांबळे.एन.व्ही सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग विद्यार्थ्या समोर मांडले.व भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.अध्यक्षीय समारोपात शाळेचे मुख्याध्यापक श्री. नंदकुमार मस्के सर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उघडून सांगितला बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले.कारण तत्कालीन समाजामध्ये जातीयता शिगेला पोहोचली होती. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी शिक्षणाची कास धरून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
तत्कालीन समाजामध्ये आपले विचार बहुजना पर्यंत पोहोचावेत व समाजामध्ये जनजागृती व्हावी याकरिता डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक जनता,बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत,यासारखी वर्तमानपत्र सुरू केली. कारण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वर्तमानपत्रे होय.तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी नदी जोड प्रकल्पाची कल्पना मांडली होती. बाबासाहेबांनी भारता मधील पडणाऱ्या पावसाचा महापुरांचा विचार करून आपले जलधोरण तयार केले. त्यांनी तयार केलेल्या जलधरणामुळेच या भारतामध्ये मोठ-मोठी धरण अस्तित्वात आहेत.
बाबासाहेबांनी आपल्या देशामध्ये वीज निर्मिती करण्यासाठी पाठपुरावा करून वीज निर्मिती आपल्या देशामध्येच होईल यासाठी प्रयत्न केले.तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब व बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटी बॉम्बे या शिक्षण संस्थेची स्थापना करून मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून बहुजनांना शिक्षणाची दालने खुली केली. बाबासाहेबांनी महिलांच्या विविध समस्यांचा सखोल साडेचार वर्ष अभ्यास करुण भारतामधील महिलांसाठी “हिंदू कोड बिल” तयार केले व ते संसदेत मांडले परंतु संसदेमध्ये त्या हिंदू कोड बिलाला कडाडून सर्वांनी विरोध केला. बाबासाहेबांनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. रक्ताचा एक थेंब न सांडता फार मोठी धार्मिक क्रांती घडवून आणली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजीमहाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचा आदर्श घेऊन देशासाठी व समाजासाठी चांगले काम करावे.आदर्श नागरिक होण्यासाठी महापुरुषांचे विचार अत्यंत मोलाचे काम करतात.या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री.वाघमारे.एस.बी श्री.कदम. एस.एस, श्री.बडे.ए.टी,श्रीमतीगुरमे.टी.एम या कार्यक्रमा प्रसंगी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी वाघमारे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.



