बीडमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्या – खा.बजरंग सोनवणे यांचे संबंधित विभागाला पत्र

बीड / प्रतिनिधी
बंजारा (लमाण) समाजाच्यावतीने बीड येथे दि.१५ रोजी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी येणाऱ्या बांधवांच्या येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्यात यावी, असे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी मुख्य महाव्यवस्थापक व प्रादेशिक अधिकारी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोकण-भवन, मुंबई व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई, यांना दिले आहे.
खा.बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, राज्य शासनाने दि. २ सप्टेंबर २०२५ रोजीचा शासन निर्णयानुसार हैदराबाद स्टेट गॅझेटियर स्वीकारले असून, त्या गॅझेटरमधील नोंदीनुसार बंजारा (लमाण) समाज अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात मोडतो. मराठवाडयातील विशेषतः तत्कालीन हैदराबाद राज्याच्या भागातील बंजारा समाजाच्या मागणीसाठी बीड जिल्हयातील संपूर्ण बंजारा समाज बांधवांनी दि. १५ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बोड येथे भव्य विराट मोर्चा आयोजित केला आहे.
या मोर्चामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक वाहनाने सहभागी होत आहेत. यामुळे मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देने आवश्यक आहे. या निर्णयामुळे जनतेला आर्थिक दिलासा मिळेल, टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होईल . बीडकडे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी देण्याच्या संदर्भात तातडीने आवश्यक आदेश निर्गमित करावेत. असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दोन दिवसापूर्वी बीड येथे बंजारा समाजातील तरुणांनी सुरू केलेल्या उपोषणाला खा.बजरंग सोनवणे यांनी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला होता. याच ठिकाणाहून आपण बंजारा समाजाच्या सोबत असून आपला या मागणीला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले होते. यानंतर टोलमाफीसाठी पत्र देऊन सामन्य नागरिकांना टोलपासून आर्थिक झळ बसू नये यासाठी पत्र दिले आहे.



